नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निवडून येतील, याची गॅरंटी नाही, मग ते जनतेला कसली गॅरंटी देत आहेत. त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी विजय हा इंडिया आघाडीचाच होणार, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत नागपूरला आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक उत्सवाच्या बाहेर येऊन बोलले पाहिजे. सभेमध्ये ते जी भाषा बोलतात, तशी गल्लीतील लोकसुद्धा बोलत नाही, अशी टीका राऊत यांनी केली. पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नाहीत, पण महाविकास आघडीचे उमेदवार आहेत. कुणी काहीही म्हणू द्या, कितीही सर्वे येऊ द्या, परिवर्तनाची सुरुवात ही विदर्भातून होते. लोक पक्ष नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार बघत आहेत. रामटेकमध्ये आमचा उमेदवार नाही पण महाविकास आघाडीसाठी मी बैठक घेत आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…रश्मी बर्वे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान; रामटेक लोकसभा मतदारसंघाचे चित्र

देवेंद्र फडणवीस यांना आकडे लावण्याची सवयच

लोकसभा निवडणुकीपूर्वीचे जे सर्वे सध्या येत आहेत, त्याबाबद्दल आम्ही सहमत नाही. आम्हाला महाराष्ट्रात शंभर टक्के यश मिळेल. देवेंद्र फडणवीस ‘४५ पेक्षा अधिक’ सांगत आहेत, त्यांचे आकडे काहीही असू द्या. त्यांना आकडे लावण्याची सवयच आहे. निवडणुकीनंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल, महाराष्ट्रात आम्हाला ३५ अधिक आणि देशात ३०५ जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रभूराम पळकुट्यांच्या मागे राहत नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रामटेकातील त्यांचा उमेदवार बदलावा लागला. ते आपल्या विद्यमान खासदाराला तिकीट देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना रोड शो घेऊ द्या की सभा, त्यांच्या हाती काहीही पडणार नाही. मुख्यमंत्र्यांचे राम प्रेम खोटे आहे. कोणत्याही लढ्यात व संघर्षात ते नव्हते. प्रभूराम पळकुट्यांच्या मागे राहत नाही, जे आत्मविश्वासाने लढतात त्यांच्या सोबत प्रभूराम असतात, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा…‘ते’ आले अन् भाजप उमेदवारासह सहकाऱ्यांना हायसे वाटले! निवडणूक व्यवस्थापनात हातखंडा असलेले…

अजित पवार व्यापाऱ्यांचे एजंट असल्याची टीका

अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत, त्यामुळे ते सौदा करतील. देश देखील व्यापारीच चालवत आहेत, त्याचे एजंट अजित पवार आहेत, अशी टीका त्यांनी केली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा अगदी बरोबर बोलल्या आहेत, देशात मोदीची लाट नाही. मोदी लाटेवर त्यांचेच उमेदवार निवडून येणार नाही. सांगलीमध्ये काँग्रेस अपक्ष आहे का लढत आहे, हे माहीत नाही. जर कुणी बंडखोरी करून निवडणूक लढवत असेल तर कारवाई केली पाहिजे. पक्षाचा नेता शिस्तभंग करत असेल तर पक्षाने त्याची हकालपट्टी करावी, असा सल्लाही राऊत यांनी काँग्रेसला दिला. नितीन गडकरी यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. ते तर गल्ल्यांमध्ये फिरत आहेत. विकास ठाकरे त्यांना चांगली लढत देतील, असेही राऊत म्हणाले.