अकोला : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक एकतेची वीण उसवली. मराठा आणि ओबीसींमध्ये अंतर निर्माण झाले. कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे.

आरक्षण आवश्यक आहेच, मात्र समाजात कटूता व दुरावा नको, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे मांडली. अकोल्यात किसान ब्रिगेडद्वारे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, हर्षवर्धन देशमुख, किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, अजहर हुसेन, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महादेवराव भुईभार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमात शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पुढे शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच्या अंतःकरणात आहेत. शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य होते. त्यांच्या सैन्य दलात सर्व जातीचे सैनिक होते. मुस्लिमही मोठ्या संख्येने होते. आज राज्यातील काही जिल्ह्यात वेगळे वातावरण आहे. विशेषतः मराठवाड्यातील वातावरण बिघडत आहे. मराठा आणि ओबीसींमध्ये अंतर निर्माण झाले. समाजातील एकतेची वीण उसवली.

आरक्षणाचा आग्रह करणाऱ्या मराठा व ओबीसींमध्ये कटूता निर्माण झाली आहे. कष्टकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. आरक्षण आवश्यक आहेच, मात्र कटूता व दुरावा नको. त्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक आहेत. कृषी क्षेत्राची परिस्थिती आज बदलली आहे. लोकसंख्या जास्त होत असताना शेती कमी होत आहे. विकास कामांसाठी शेतीची जमीन घेतली जाते. दिवसेंदिवस जमीन कमी-कमी होत आहे. त्यातून शेतीवर बोजा वाढला. तो बोजा कमी करण्याची गरज आहे. घरातील दोनपैकी एका मुलाने शेतकरी केली पाहिजे. उत्पादन व खर्चाचा विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, हीच शासनाची भूमिका असावी, असे शरद पवार म्हणाले.

एआय तंत्रज्ञानातून केळीचे अद्भूत उत्पादन

गेल्या तीन वर्षापासून कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत आहे. एआय तंत्रज्ञानातून कृषी समस्यावर तोडगा काढू शकतो. एआय तंत्रज्ञानातून केळीचे अद्भूत उत्पादन घेता येते. ऊसामध्ये हे तंत्रज्ञान वापरले. पिकांमध्ये मोठी सुधारणा झाली. महाराष्ट्रात सुदैवाने चार कृषी विद्यापीठे आहेत. कापूस, सोयाबीनसाठी एआय तंत्रज्ञान वापरावे. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. कष्टकरी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व अर्थसहाय्य देण्याची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन महत्वाचे आहे. उत्पादन खर्च व बाजारातून मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ साधता येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.