डॉ. राजेंद्र राऊत यांचे प्रतिपादन; भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनातर्फे व्याख्यान

नागपूर : श्री चक्रधर स्वामींनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मूल्ये जोपासणाऱ्या पुरोगामी व उदारमतवादी विचारांचे बिजारोपण आपल्या कृतिशील लीळांद्वारे करून अंधश्रद्धा, कर्मकांडावर आघात केला. सोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन, डोळसता असावी, स्त्री-पुरुष समानता असावी असा समतावादही रुजवला. त्यामुळे श्री चक्रधर स्वामी हे सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते ठरतात, असे प्रतिपादन महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक डॉ. राजेंद्र राऊत यांनी केले.

श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतारदिनाच्या अष्टशताब्दीनिमित्त आज बुधवारी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी  अध्यासनाच्या वतीने आयोजित या ऑनलाईन कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून डॉ. राऊत बोलत होते.

ते म्हणाले,  मानवी मूल्यांची जपणूक ही श्री चक्रधरांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. निखळ माणूसपणात माणसाचे सर्वस्व असून आजच्या वर्तमान काळात चक्रधरांच्या कृतिशील कार्याची गरज आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. लता लांजेवार यांनी श्री चक्रधर स्वामींच्या व्यक्तित्त्वाचे विशेष सांगताना अहिंसा व सामाजिक मूल्यांची अनेक उदाहरणे दिली. विशेषत: स्त्री सक्षमतेसाठी महानुभाव पंथ व चक्रधर स्वामी यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून दिले.  प्रारंभी अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक करून अध्यासनाची माहिती दिली व उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. हेमराज निखाडे यांनी  संचालन केले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक श्रोत्यांनी हजेरी लावली.