वर्धा : समाजातील दुर्बल व मागास जातींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबविते. त्यासाठी प्रशिक्षण संस्था पण सूरू करण्यात आल्या आहेत. पण अन्य घटक पण आर्थिक दुर्बल असतात म्हणून त्यांनाही मोफत शैक्षणिक प्रशिक्षण मिळावे, असा हेतू ठेवून आता उपक्रम आला आहे. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या नामांकित संस्थेचा यात पुढाकार आहे. औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेतर्फे मोफत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. यासाठी खुल्या प्रवर्गातील ईच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे खास खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आहे. त्यात ब्राम्हण, मारवाडी, राजपूत, गुजराती, कम्मा, कायस्थ, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, येलमार, त्यागी, सेनगुथर, बनिया, राजपुरोहित, नायर, अय्यनगार, नायडू, पाटीदार या जातीतील विद्यार्थ्यांना संधी आहे. त्यात कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळातर्फे योजणांचा लाभ मिळत नाही, अश्यांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. अर्जदार लक्षित गटातील असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ८ लाख रुपयाच्या आंत असावे. विद्यार्थी हा अभियांत्रिकी पदवीधारक ( आयटी, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉमुनिकेशन, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अथवा बीएससी, बिसए, बीसीएस, एमएससी संगणक विज्ञान, एमसीए पदवी उत्तीर्ण असावा. अर्जदार अमृतच्या लक्षित गटातील असावा.
अर्ज करतांना काही कागदपत्रे अपेक्षित आहेत. आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र तसेच अमृत लक्षित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा. ८ लाख रुपयाखालील उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. एनआयईएलआयटी संस्थेच्या संकेतस्थळावर अमृत प्रशिक्षण योजनेसाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अमृत संस्थेच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करण्याची सूचना आहे. संकेतस्थळाच्या मुख्य पानावरील योजना या टॅबमध्ये जात एनआयईएलआयटी प्रशिक्षण योजना या बटणावर क्लिक करीत अर्जाची नोंदणी करता येईल.
टपालाने किंवा ई मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जाहिरात रद्द किंवा मुदतवाढीबाबत तसेच अर्ज नाकारणे व स्वीकारणे, निवडीची पद्धत बदलणे याचे सर्व अधिकार अमृतच्या व्यवस्थापकीय संचालक यांना राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे. अर्ज सादर करतांना कोणत्याही अडचणी आल्यास अमृतच्या मेलवर किंवा ९७३०१५१४५० या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याची सूचना आहे.