लोकसत्ता टीम

गोंदिया : विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे एक शिस्तबद्ध विद्यार्थी घडावा यासाठी केंद्र शासनाच्या वतीने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सविधायुक्त नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयात या सुविधा उपलब्ध असल्यातरी येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास किंवा छोटे- मोठे अपघात घडल्यास त्याकडे विद्यालय प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असताना याची साधी माहितीही पालकांना दिली जात नसल्याचे एका प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे या विद्यालयात नेमके चालले तरी काय? अशी विचारणा करण्याची वेळ या विद्यालयात अध्ययनरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर आली आहे.

आणखी वाचा-अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार, नराधमास २० वर्षांची शिक्षा

आजघडीला नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयात जिल्ह्यातील प्रत्येकच तालुक्यातील निवडक विद्यार्थी अध्ययनरत आहेत. सालेकसा तालुक्यातील अंश अर्जुन सुर्यवंशी हा विद्यार्थी देखील इयत्ता ७ व्या ( ब ) वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी शाळेच्या पटांगणात फुटबॉल खेळताना तो पडला. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यास प्रथमोपचार करून त्याच्या रुमकडे जाण्यास सांगितले. मात्र, त्याच्या हाताला चांगलाच मार लागला असल्यामुळे तो रात्रभर विव्हळत राहिला तर दुसऱ्या दिवशी सकाळी अंशच्या हातावर सुज आली.

यावेळी प्रशासनाकडून पुन्हा थातूरमातूर उपचार करण्यात आले. मात्र, त्रास अधिक असल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. हा प्रकार घडला असताना विद्यालय प्रशासनाकडून अंशच्या पालकांना तीन दिवसांपर्यंत कसलीच माहिती देण्यात आली नाही. मात्र, मग अंगावर येणार असे वाटत असताना १० ऑगस्ट रोजी अंशचे वडील अर्जुन सुर्यवंशी यांना घटनेची माहिती देण्यात आली.

आणखी वाचा-जिल्हा परिषद भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी डोकेदुखी! सर्व्हर डाऊन, आज शेवटची तारीख

दरम्यान, त्यांनी ११ ऑगस्ट रोजी विद्यालय गाठून अंशला गोंदिया येथील खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी मोठे फॅक्चर असून शस्त्रक्रीया करावी लागणार असल्याचे सांगितले. अंशला वेळीच उपचार मिळाला असता तर शस्त्रक्रीयेची गरज नसती मात्र, विद्यायल प्रशासनाचा बेजबाबदार पणा अंशला अपंग करून गेला. तर शस्त्रक्रीयेसाठी मोठा खर्च त्याच्या वडीलांना करावा लागला. विशेष म्हणजे, मागील वर्षी देखील फुटबॉल खेळताना गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील संगम खिलेश्वर बोपचे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तरी देखील प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

या प्रकारावरून नवोदय विद्यालयात अध्ययनरत असलेले विद्यार्थी खरंच सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न निर्माण होत असून अंश सारखे अनेक विद्यार्थ्यांबरोबर हा प्रकार घडला असावा मात्र, कदाचित आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी कुणीही बोलत किंवा पुढे येत नसावे.

आणखी वाचा-गदर यांच्यावरील काव्यसंमेलन थांबवले! पूर्वपरवानगी न घेतल्याने पोलिसांचा आक्षेप

मुलाला दुसऱ्या शाळेत दाखल करणार

नवोदय विद्यालयात सर्व काही व्यवस्थित आहे. मुलांची काळजी घेतली जाते या भरवशावर आपल्या मुलांना आम्ही पाठवतो. मात्र, विद्यालय प्रशासनाकडून असे प्रकार घडत असतील तर काय म्हणावे, आजघडीला मला ७० हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर यापुढे आपण अंशला दुसऱ्या शाळेत दाखल करणार असून यासाठी टिसीची मागणी विद्यालयाकडे केली आहे. -अर्जुन सुर्यवंशी, पालक सालेकसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फुटबॉल खेळताना पडला त्यां दिवशी त्याने विद्यार्थ्याने कुणालाही सांगितले नाही. तर दुसऱ्या दिवशी विद्यालयातील नर्सला सांगितले. यावेळी त्यास शासकीय रुग्णालय नेण्यात आले. व एक्सरा काढण्यात आला. तर त्याच वेळी त्याच्या पालकांना कळविण्यात आले, तसे रेकॉर्डही आपल्याकडे आहे. स्वत: त्याचे वडीलच उशिरा आले. तेव्हा अंशचे पालकाकडून होत असलेले आरोप खोटे आहे. -देवानंद थूल, प्रचार्य, नवोदय विद्यालय, नवेगावबांध