नागपूर : पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस पडत असला तरी दुपारी चांगलेच उन्ह तापते. उन्हाच्या तडाख्यात सर्वत्र विविध आजाराचे रुग्ण वाढले आहेत. नागपूर जिल्ह्यात एकाही उष्माघाताच्या रुग्णाची नोंद नसली तरी तीन संशयित मृत्यू आहेत. परंतु, येथे एकाही रुग्णाची नोंद नसल्याने उष्माघाताच्या रुग्णाची लपवाछपवी सुरू आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यातील सर्वाधिक उन्ह तापणाऱ्या जिल्ह्यात पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांचा समवेश आहे. यंदाच्या उन्हाळ्यात दुपारी उन्ह तापत असले तरी अधून- मधून अवकाळी पाऊसही पडत आहे. उन्हाच्या तडाख्यात गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात विविध आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मंगळवारी २४ तासांत येथील शासकीय रुग्णालयांत नऊ हजारावर रुग्ण नोंदवले गेले.

खासगी रुग्णालयात यापेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केला गेला. या नोंदीत नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांची नोंद नाही. उपचारादरम्यान बऱ्याच रुग्णांचा इतिहास उन्हातून घरी आल्यावर आजारपणाचाही आहे. हे रुग्ण उष्माघात संशयितांमध्ये नोंदवणे अपेक्षित आहे. परंतु, उष्माघातात नोंद केल्यास या रुग्णांच्या इतिहासासह इतरही सगळ्या नोंदी करण्याचा खटाटोप करावा लागत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर हे रुग्ण इतर आजारात टाकत असल्याचा संशय वैद्यकीय क्षेत्रात वर्तवला जात आहे. नागपूर जिल्ह्यात अद्याप एकाही उष्माघात संशयित रुग्णाची नोंद आरोग्य विभागाने केली नाही. उलट नागपूर महापालिकेने तीन उष्माघात संशयितांचा मृत्यू नोंदवला आहे. त्यामुळे येथे एकही संशयित रुग्णच शोधला नसताना तीन संशयित मृत्यू नोंदवल्याने येथील उष्माघात नोंदीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सदर आकडेवारीला नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला. तर नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी बोलणे टाळले.

हेही वाचा >>>नागपुरात हत्यासत्र थांबेना…आता दारूच्या वादातून बापलेकांनी केला युवकाचा खून…

पूर्व विदर्भात १३ उष्माघात संशयितांची नोंद

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात १३ उष्माघात संशयितांची नोंद आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाने केली आहे. त्यापैकी सर्वाधिक ६ रुग्ण गडचिरोली तर ६ रुग्ण गोंदिया जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. १ रुग्ण वर्धा जिल्ह्यात नोंदवला गेला आहे. तर भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात मात्र एकही उष्माघात संशयित रुग्णाची नोंद नाही.

शासकीय रुग्णालयातील विविध आजाराचे रुग्ण

(१४ मे २०२४, चोवीस तासातील)

जिल्हा             रुग्ण उष्माघात संशयित

नागपूर (श.) २,८१५             ००

नागपूर (ग्रा.) ७५९             ००

वर्धा             ४,९२२             ०१

भंडारा             १५१             ००

चंद्रपूर (श.) १४१             ००

चंद्रपूर (ग्रा.) १४९             ००

गडचिरोली            ११९             ०६

गोंदिया             ०००             ०६

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण             ९,०५६            १३