बुलढाणा : खरीप हंगाम अनिश्चित असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगाराच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. यामुळे आज जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांवर विक्रमी २५ हजारावर मजुरांची नोंद झाली. मागील दोन वर्षांतील ही विक्रमी संख्या असल्याचे वृत्त आहे.
मे महिना कडक उन्हाऐवजी जोरदार वादळी अवकाळी पावसानेच गाजला. २ ते २९ मे दरम्यान नियमित अंतराने दमदार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच ३८ महसूल मंडळात अतिवृष्टी म्हणजे ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी पिके, भाजीपाला, कांदा, फळबागांचे नुकसान केले. यामुळे शेती मशागतीची कामे रेंगाळली. तसेच नांगरणी, वखरणीची कामे आता ट्रॅक्टरनेच होत आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराची समस्या तीव्र झाली आहे. परिणामी मे महिन्यात रोजगार हमी योजनेची कामे हा बेरोजगार, मजूर, कामगार यांच्यासाठी मोठा आधार ठरला.
मे महिन्यात ‘रोहयो’च्या विविध कामांवर सरासरी १५ हजार मजूर कामावर होते. मे मध्यानंतर १७ मे रोजी १५३९४, तर २१ मे रोजी १५३८८ मजूर कामावर होते. त्यात नंतर झपाट्याने वाढ झाली. २७ मे रोजी हा आकडा २१ हजार ५२ वर गेला. यावर कळस म्हणजे ६ जून रोजी मजूर उपस्थितीने २५ हजार ६०० चा विक्रमी आकडा गाठला. हा मागील दोन वर्षांतील सर्वात मोठा आकडा आहे. यावरून ग्रामीण भागातील बेरोजगारीची तीव्रता किती तीव्र आहे, हे स्पष्ट होते.
खरीप हंगाम पूर्व मशागतीची कामे पावसामुळे लांबली आणि आता पाऊस नसल्याने खरीपाच्या पेरण्या जून मध्यानंतरच होतील, असे चित्र आहे. यामुळे मनरेगावरील मजुरांची संख्या वाढतीच राहणार, असा यंत्रणांचा अंदाज आहे.
सध्या सिंचन विहिरी, घरकुल, वृक्षरोपण, फळबागाची कामे मोठ्या संख्येने सुरू आहेत. तसेच काही वाळू डेपोतून किफायतशीर भावात घरकुलसाठी वाळू मिळत आहे. यामुळे घरकुल कामांची संख्या वाढली आहे. मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली या तालुक्यांतील ‘रोहयो’ कामांची संख्या लक्षणीय आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील ४८ पैकी ३२, सिंदखेड राजा मधील ८९ पैकी ६५, मेहकर तालुक्यातील ९८ पैकी ६०, चिखलीमधील ९९ पैकी ५३ ग्रामपंचायत क्षेत्रात कामे सुरू आहे. पेरण्या लांबण्याची दाट शक्यता असल्याने मजूर हजेरीचा हा आकडा २३ हजारावर जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.