चंद्रपूर: काँग्रेस पक्षाने मला बरेच काही दिले आहे. दोन वेळा मंत्री, दोन वेळा विरोधी पक्ष नेता, चार वेळा आमदार झालो. त्यामुळे काँग्रेसचे तिकीट मागितले, हा माझा अधिकार होता. मी पक्षाशी गद्दार होऊच शकत नाही, असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मीच विरोधी पक्ष नेता होतो. आताही मीच विरोधी पक्ष नेता असल्याने प्रतिभा धानोरकर या विजयी होतील असेही वडेट्टीवार म्हणाले.

केंद्रात व राज्यात इंडिया आघाडी व महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. केंद्रात सत्ता आली तर प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी जनगणना करण्याची मागणी लावून धरावी, तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रिमंडळात मला चांगले खाते द्यावे असेही वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, वडेट्टीवारांच्या या मागणीवर प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, चंद्रपूरकरांना शब्द देतो, चांगले खाते देईल.

हेही वाचा…अरे हे काय?….संजय देशमुख यांच्या पत्नीने दाखल केली अपक्ष उमेदवारी!

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा व बैठक इंम्पेरिअल पॅलेस येथे झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार मुकुल वासनिक, खासदार चंद्रकांत हांडोरे, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, शहर अध्यक्ष रामू तिवारी उपस्थित होते.

देशाच्या राजकारणात परिवर्तनाची लहर आहे. केवळ सत्तेसाठी धर्माचे राजकारण सुरू असून आज लोकांना धर्माच्या नावावर विभाजित करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. काँग्रेस व इंडिया आघाडीकडून देशातील लोकांना जोडण्याचे काम सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनविरोधी काम केल्याने केंद्रात व राज्यात इंडिया व महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.

हेही वाचा…अमित शहा यांचा पूर्व विदर्भ दौरा अचानक रद्द

चेन्नीथला म्हणाले, काँग्रेस पक्ष हा सर्वांना घेऊन चालणारा आहे, लोकांच्या मनात राहुल गांधी आहेत, त्यामुळे जनता निवडणुकीत काँग्रेस सोबत राहिल. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या भाषणात इंडिया आघाडीच्या पाच हमी मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा…विश्लेषण : जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा कसा मिळाला? सर्वोच्च न्यायालयाने काय कारण दिले?

भाजपवाले ४०० पार नाही तर पक्के ४२० आहे असेही ते म्हणाले. खासदार मुकुल वासनिक म्हणाले, गुजरातने २०१४ रोजी देशाला पंतप्रधान नाही तर अभिनेता दिला. अभिनेते नायक व खलनायक अशा दोन प्रकारचे असतात, मात्र देशाला मिळालेला हा अभिनेता खलनायक आहे. खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करतांना आमचे लोक आमचीच गळचेपी करीत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी केले. संचालन विनो दत्तात्रेय यांनी केले.