लोकसत्ता टीम

चंद्रपूर : वाळू, कोळसा, दारूतस्करी व अवैध व्यवसायांमुळे शांतताप्रिय चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता भंग पावली आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतून बंदूक, देशी बनावटीच्या पिस्तुलांसह इतर शस्त्रांचा साठा चंद्रपुरात येत आहे. या शास्त्रांचा सर्रास वापर होत असल्याने गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात बंदूक बाळगल्याप्रकरणी ८ तर तलवार बाळगल्याचे ४८ गुन्हे दाखल आहे.

एकेकाळी ‘शांत शहर’ म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होती. कालांतराने जिल्ह्यात वाळू, कोळसा, दारूची अवैध तस्करी सुरू झाली. ती आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तस्करी आणि वर्चस्वाच्या लढाईतून उत्तर प्रदेश, बिहारसारख्या परराज्यांतून जिल्ह्यात बंदूक आणि देशी बनावटीच्या पिस्तुलांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलिसांनी या तस्करावर कारवाई केली, त्याचे मूळ शोधण्यात त्यांना अपयश आले.

आणखी वाचा-बुलढाणा: दरोडेखोरांची दाम्पत्याला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवैध धंद्यांमुळे जिल्ह्यात टोळीयुद्ध, हाणामाऱ्या, हत्याकांड, जीवघेणे हल्ले, अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. राजकीय आशीर्वादाने वाळू, कोळसा, गुटखा व अवैध दारू तस्करीचा व्यवसाय आणि त्याच्या सोबतील ऑनलाईन क्रिकेट सट्टा, व्हीडिओ गेम पार्लर, कोंबडबाजार, भंगार तथा इतर अवैध धंदे सुरू आहेत. वाळू तस्करी, कोळसा व दारू तस्करीचे रॅकेट नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत आणि तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांपर्यंत पसरलेले आहे. यातून येणाऱ्या बक्कळ पैशामुळे हे अवैध धंदेचालक गब्बर झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धा निर्माण होऊन खुनाच्या घटना वाढू लागल्या आहेत.