नागपूर : आतापर्यंत दोन गोष्टी खऱ्या सांगून आठ गोष्टी खोट्या पेरून छत्रपती शिवाजी महाराजांना बहुजनापासून दूर करण्याचे कट कारस्थान करण्यात आले, अशी टीका प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांनी केले. बहुजन मंचतर्फे नागपुरात आयोजित शिवशाही महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार गेव्ह आवारी, प्रमुख पाहुणे माजी आमदार अशोक धवड होते. किरण माने म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने बहुजनवादी होते म्हणून तर त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला धक्कासुद्धा लावायचा नाही असा आदेश आपल्या लष्कराला दिला होता. दुष्काळात रयतेकडून कर वसुली करायची नाही. जर कुणी केली तर छत्रपती त्याला शिक्षा करायचे. असे शेतकऱ्यांच्या दुःखाला समजणारे शेतकरीचे कैवारी होते छत्रपती.

हेही वाचा – २८ एचआयव्हीग्रस्त मातांकडून निरोगी व एचआयव्हीमुक्त बाळांना जन्म, चंद्रपूर शासकीय रुग्णालयात…

खरे छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असेल तर गोविंद पानसरेचे पुस्तक वाचा, असे आवाहन त्यांनी केले. शिवशाही महोत्सवाच्या आयोजनाविषयी बोलताना नरेंद्र जिचकार म्हणाले की शिवशाही महोत्सव हा फक्त सिने तारकांना आणून नाचवण्याचा महोत्सव नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्शवादी जिवन, त्यांची स्वराज्याची संकल्पना, त्याचे विचार घराघरात पोहचवायचे आहे. समाजाने जे मला दिले ते परतफेड करणे मी माझे कर्तव्य मानतो. आजवर हजारच्या वर मेडीकल कॅम्प घेऊन गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मला छत्रपतींच्या विचारांमुळेच मिळाली.

मी माझ्या आयुष्यात दोनच गोष्टी ठरवल्या आहे. एक छत्रपतींच्या विचारांनुरूप आयुष्य जगणे आणि दुसरे बाबासाहेबांच्या संविधानाचे पालन करणे. शिव जयंती साजरी करताना ती भव्यच असायला हवी पण त्यात पावित्र्यही असायला हवे. शिव विचाराचा जागर करणे महत्त्वाचे आहे. याप्रसंगी येत्या ९ मार्चपासून जन आशीर्वाद यात्रेचा पुढचा टप्पा सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

याप्रसंगी अशोक धवड म्हणाले मी नरेंद्र जिचकार यांच्या सोबत आहे कारण ते सच्चे आहे. आणि जिथे सत्य असतो तिथे संघर्ष असतोच. आज ते संघर्ष करीत आहे पण विजय शेवटी सत्याचाच होतो. अध्यक्षीय भाषण करताना माजी खासदार गेव्ह आवारी यांनी सांगितले की नरेंद्र जिचकार यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा शिवशाही महोत्सव बघून मला डॉ श्रीकांत जिचकार यांची आठवण झाली. मला नरेंद्र जिचकार यांच्यात श्रीकांत जिचकार दिसतात. नरेंद्र जिचकारांची जन आशीर्वाद यात्रा ही राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रेचे प्रतिबिंब आहे. आणि नरेंद्र जिचकार यांना न्याय आवश्य मिळेल.

हेही वाचा – नागपुरात २३ हजारांवर नागरिकांचे वाहन चालवण्याचे परवाने निलंबित; कारण काय? जाणून घ्या…

याप्रसंगी शिवश्री पुरस्कार देऊन पज्ञश्री डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ. संजिव चौधरी आणि मौलाना हाफिज मोहम्मद उस्मान खान यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवशंभू पितापुत्रांचे अविस्मरणीय भावबंध या विषयावर प्रसिद्ध व्याख्यानकर्ते डॉ शिवरत्न शेंटे यांचे व्याख्यान झाले. डाॅ. शेंटेनी आजच्या वडील मुलांचे संदर्भ घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचे नाते उलगडून दाखविले. आग्र्यातील औरंगजेबाच्या कैदेतून निसटल्यावर मथूरा येथे बाळ संभाजीला ठेवून एकटे एकविस दिवसात स्वराज्यात परत येताना छत्रपतीचे व्याकुळ झालेले मन. बाळ संभाजीची मनोवस्था, संभाजी राजे मरण पावले याची उठवलेली अफवा, राजमाता जिजाऊचे दुःख, संभाजी राजे जिवंत असताना महाराजांनी त्यांच्या नावाने केलेले पिंडदान, संभाजी राजेचे बंड अशा अनेक घटनेतून बापलेकाचे भावनिक संबंध अतिशय समर्पक पद्धतीने त्यांनी मांडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटच्या सत्रात महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आढावा घेणारा गर्जा महाराष्ट्र माझा हा गीत नाट्य कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाची संकल्पना चारूदत्त जिचकार यांची असून संगीत संयोजन श्रीकांत पिसे यांचे होते. नाट्य दिग्दर्शन पूजा पिंपळकर भोयर हिने केले. सुरवातीला स्वामी विवेकानंद हे एकपात्री दिपाली घोंगे यांनी सादर केले. ध्वनी व्यवस्था बंडू पदम यांनी सांभाळली तर प्रकाश योजना मिथून मित्रा यांची होती. महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवशाही कृती समिती, शिवशाही महिला समिती यांनी विशेष परिश्रम घेतले.