नागपूर : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत करात म्हणाल्या की, भाजपने ज्यांच्यावर सर्वाधिक भ्रष्टाचाराचा आरोप केला तेच आता भाजपचे सर्वात जवळचे मित्र आहेत. यावरून या पक्षाचा ढोंगीपणा दिसून येतो. माझ्या मते संपूर्ण भारतातील हा एकमेव पक्ष आहे, जो वॉशिंग मशीन सारखे काम करतो आणि मोदींचा जयजयकार करणाऱ्यांची पापे धुवून टाकतो, अशी टीका माजी राज्यसभा सदस्य आणि माकपच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांनी केली. त्या आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भाजप यांच्यासाठी नैतिकता, देशातील जनतेशी काही देणेघेणे नाही तर त्यांच्यासाठी केवळ सत्ता बळकावणे हेच एकमेव ध्येय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे विरोधी पक्षाच्या बैठकीला एकत्र आलेल्या नेत्यावर टीका करताना हे नेते देशासाठी नव्हेतर कुटुंबासाठी नेते एकत्र म्हटले होते. त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मोदींना प्रतिउत्तर दिले. तसेच त्यांनी ‘एनडीए’बाबत देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘एनडीए’च्या बैठकीत आज जे बसले त्यापैकी अर्धे नेते ईडी, सीबीआय आणि आयटीच्या भीतीमुळे पक्षांतर करणारे आहे. वास्तविक भाजपचे ‘एनडीए’मधील प्रमुख मित्र ईडी, सीबीआय आणि आयकर आहेत. या तिन्ही तपास यंत्रणा ‘एनडीए’च्या बैठकीत हजर असायला हवे होते, असा टोलाही त्यांनी भाजपला हाणला.