नागपूर : रसाळ संत्री आणि तर्री पोहा यापेक्षा वेगळी नागपूरची ओळख सांगायची झाल्यास देशातील मारबत आणि बडग्याची मिरवणूक निघणारे एकमेव शहर.
राज्य विकास पर्यटन मंडळाने मान्यता दिलेल्या या मिरवणुकीची शहराने वर्षानुवर्षे परंपरा जपली आहे. त्यामुळे तान्हा पोळ्याच्या दिवशी नागपुरात निघणाऱ्या मारबत मिरवणुकीसाठी नागपूर हे शहर जगात ओळखले जाते. या मारबत मिरवणुकीत काळी व पिवळी मारबतीसह राजकीय नेते आणि सध्याच्या सामाजिक व राजकीय घडामोडीवर बडगे तयार केले जात असल्यामुळे या बडग्याचे मिरवणुकीत विशेष आकर्षण असते. हे बडगे का तयार करतात, चला तर जाणून घेऊया या बडग्यांचा इतिहास.
भोसले राजघराण्यातील बकाबाई या महिलेने इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. तिच्या पतीने याला विरोध केला नव्हता. बकाबाईचा निषेध म्हणून काळी मारबत काढली जात असताना तिच्या पतीच्या नावाने बडगे तयार करून त्या पुतळ्याची मिरवणूक काढून निषेध केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत देशभरातील विविध घटनांवर आणि राजकीय नेत्यांवर बडगे तयार करत निषेध केला जातो.
गेल्या काही वर्षांत नक्षलवादी, भ्रष्टाचार करणारा बडग्या, महापालिकेवर टीका करणारा, सरकारवर टीका करणारा, डिझेल पेट्रोल दरवाढीसह महागाईवर भाष्य करणारे बडगे तयार करण्यात आले आहे. मध्य नागपुरातील लालगंज, मस्कासाथ, जागनाथ बुधवारी, मासुरकर चौक, नाईक तलाव या भागात हे बडगे तयार केला जातात. यावर्षी विविध विषयांवर बडगे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते कुठल्या विषयावर याबाबत उत्सुकता लागली आहे.