अमरावती: ‘सावली कधीच आपली साथ सोडत नाही’ असे वारंवार सांगितले जात असले, तरी येत्या २५ मे रोजी काही मिनिटांसाठी सावली प्रत्येकाची साथ सोडणार आहे. या दिवशी दुपारी १२ ते १२.३० दरम्यान सूर्य डोक्यावर आल्यावर सावली दिसेनाशी होणार आहे. या ‘झीरो शॅडो’चे निरिक्षण करण्यासाठी खगोल अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘शून्य सावलीचा दिवस’ असे म्हटले जाते. त्याचाच अनुभव येत्या २५ मे रोजी दुपारी १२ ते १२.३० या दरम्यान ५२ सेकंद अमरावतीकरांना प्रत्यक्ष घेता येणार आहे. खगोल अभ्यासकांनी ही माहिती दिली आहे.
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो नेहमी उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो. पण, या दोन टोकांच्या वृत्तांमधील नागरिकांना वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवता येतो. जेव्हा सूर्य डोक्यावर येतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते.
शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे. खगोलप्रेमी अमरावतीकरांनी २५ मे रोजी दुपारी १२ ते १२.३० या दरम्यान ५२ सेकंदांसाठी आपली सावली गायब होण्याचा रोमांचकारी अनुभव प्रत्यक्ष घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.
शून्य सावली दिवस म्हणजे नेमके काय?
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५०° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज ०.५० ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो.