नाशिक : सुरगाणा तालुक्यातील करंजाळी येथे १३ वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. सविता शिवाजी भोये असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सविता निफाड तालुक्यातील मुखेड येथील आदिवासी आश्रमशाळेत सहावीच्या इयत्तेत शिकत होती. सविताच्या घराजवळ ठक्कर बाप्पा योजनेच्या विहिरीचे सुमारे चार वर्षांपासून ठेकेदारामार्फत बांधकाम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही विहिरीचे बांधकाम वेगाने करण्यात आले नाही.
विहीर घराजवळ असल्याने सविता शेतात जात असतांना पाय घसरून विहिरीत पडली. विहीर खोल असल्याने पोहण्यात तरबेज असलेल्यांनी तिला बाहेर काढले. यानंतर तिला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
करंजाळी गावात चार वर्षांपासून कळवण प्रकल्पामार्फत ठक्कर बाप्पा योजनेतंर्गत विहिरीचे फक्त खोदकाम करण्यात आले आहे. तिचे बांधकाम अद्याप पूर्ण न केल्याने मुलीला जीव गमवावा लागला असून यापूर्वी देखील अनेकवेळा गायी, बैलरे विहिरीत पडले आहेत. अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करुन संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.