नाशिक – शहराजवळील विल्होळी येथे पावसात मासेमारीसाठी गेलेल्या ३३ वर्षीय युवकाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, गोदाघाट परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये गोदावरीत वाहून जाणाऱ्या दोघांना जीवरक्षकांनी वाचविले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, विल्होळी येथे बुधवारी सायंकाळी लक्ष्मण जाधव (३३) हा युवक महामार्गालगतच्या बंधाऱ्यात मासेमारीसाठी गेला होता. पाण्यात उतरल्यानंतर काही वेळात त्याला दम लागला आणि तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच यंत्रणेकडून शोध मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी अंधार पडल्याने थांबवलेली मोहीम गुरुवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली. ११ वाजता लक्ष्मण जाधव यांचा मृतदेह हाती लागल्याची माहिती महसूल यंत्रणेकडून देण्यात आली.
गोदाघाट परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवक गोदावरी नदीत वाहून जात असताना जीवरक्षकांनी त्यांना वाचवले. दुपारी राजस्थान येथील कुटुंब गोदावरी काठावर आले होते. या कुटुंबातील १५ वर्षाचा मुलगा नदीत वाहून जात असल्याचे लक्षात आल्यावर क्षणाचाही विलंब न करता जीवरक्षक गणेश उईके, अजित सडमाके आणि अण्णा सोनवणे यांनी पाण्यात उड्या मारत संबंधितास वाचवले. सायंकाळी गोदा घाटावरील दुतोंड्या मारूती ते यशवंतराव महाराज पटांगण परिसरात अमन खान (१३, वडाळा) हा मुलगा वाहून जात असताना नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरुपपणे पाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी सचिन राऊत, योगेश घोडके, भास्कर बेनके आदी सुरक्षारक्षक उपस्थित होते. अमनला कुटुंबियांपर्यत पोहोचविण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पातळी उंचावली आहे. या काळात धोकादायक ठरू शकणाऱ्या, अपरिचित भागात पाण्यात उतरू नये, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूर्वीच केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत भाविक, पर्यटक पाण्यात उतरतात आणि दुर्घटनेला निमंत्रण मिळते. सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांकडून याच प्रकारे नियम धाब्यावर बसविले गेल्याचे उघड झाले आहे.