नाशिक : इगतपुरी तालुक्यातील आडवण आणि पारदेवी येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी गावातून एमआयडीसी विरोधात काढलेला मोर्चा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इगतपुरी तालुक्यातील आडवण, पारदेवी येथील शेतकऱ्यांची जमीन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात दोन्ही गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले आहे .अंबड-सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी इगतपुरी तालुक्यातील आडवण येथून शेतकऱ्यांच्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले. यावेळी ज्ञानेश्वर कोकणे, तुकाराम कोकणे, पांडुरंग कोकणे, नारायण शेलार आदींसह महिलाही या मोर्चात सहभागी झाल्या. मोर्चा मुंढेगावमार्गे विल्होळी येथे मुक्कामी थांबला.
मोर्चा शनिवारी सकाळी विल्होळीहून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर मोर्चेकऱ्यांनी प्रवेशद्वारापुढे ठिय्या दिला. मोर्चेकऱ्यांमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अंबड आणि सातपूर येथील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या सर्व भूखंड घोटाळ्यांची उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.