नाशिक – वडिलांच्या खिशातील पैसे काढणाऱ्यांना विरोध केल्याच्या रागातून टोळक्याने १९ वर्षाच्या मुलाची हत्या केली. गोदाकाठावरील बुधवारच्या आठवडे बाजारात रात्री ही घटना घडली. सातत्याने होत असलेल्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांनी तातडीने कारवाई करुन दोन तासांच्या आत दोन संशयितांना ताब्यात घेतले.

पंचवटीतील गाडगे महाराज पूल परिसरात दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. रात्री आठ वाजता पंचवटीतील सितागुंफा भागात राहणारे तक्रारदार जगत दास (मूळ रा. बिहार) हे मुलगा नंदलाल उर्फ सूरज दास याला घेऊन भाजीपाला खरेदीसाठी बाजारात गेले होते. भाजी खरेदी केल्यावर ते खिशातून पैसे काढत असताना अकस्मात चार जणांचे टोळके आले. त्यांनी दास यांच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तक्रारदार दास आणि त्यांचा मुलगा नंदलाल यांनी विरोध केला असता संतप्त टोळक्याने शिवीगाळ आणि मारहाण केली.

टोळक्यातील एकाने धारदार शस्त्राने नंदलाल याच्यावर वार केले. नंतर टोळके पळून गेले. या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या नंदलाल यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी जगत दास यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हे शोध पथकाने मानवी कौशल्याने या गुन्ह्यात साहिल उर्फ डोकोमो गायकवाड (२०), शुभम उर्फ ब्लॅकी सोनवणे (२०) आणि दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची माहिती प्राप्त केली. संशयित हे पंचवटीतील अवधूतवाडी, फुलेनगर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त पद्मजा बढे आदींच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.