नाशिक – नाशिकहुन मुंबईला जाणाऱ्या तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधून मुंबईला प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यास घोटी आणि समृद्धी महामार्ग असा दुहेरी टोलचा भुर्दंड पडत आहे. हा भार परवडणारा नसून समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना घोटीचा टोल माफ करावा, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेसने केली आहे.

घोटी टोल नाक्यावर वाहननिहाय तर समृद्धी महामार्गाचा टोल प्रतिकिलोमीटर शुल्क आकारून घेतला जातो. नाशिक-मुंबई महामार्गाची सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ठिकठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना कित्येक तास खोळंबून राहावे लागते. अशावेळी वाहनधारक समृद्धी महामार्गाचा वापर करतात. त्यासाठी घोटी आणि समृद्धी महामार्गाचा असा दोनवेळा टोल द्यावा लागतो. तो सामान्य माणसाला परवडणारा नसल्याकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोलच्या दुहेरी भुर्दंडामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष आहे. समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना घोटी टोलमधून दिलासा द्यावा. अशी मागणी छाजेड यांनी केली. शासनाने समृद्धी महामार्गावर इंधन भरण्याची व्यवस्था तसेच सामान्य नागरिकांना अल्पोपहारासाठी हॉटेल वा उपहारगृह त्वरित सुरू करावे. वाहनधारकांना प्रवासात काही अडचणी आल्यास तत्पर आरोग्य व पोलीस यंत्रणेची मदत मिळावी. अशी वाहनधारकांची मागणी आहे. या संदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. समृद्धी महामार्गाशी संबंधित जिल्ह्यातील वाहनधारकांच्या मागण्या लवकर मार्गी न लागल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.