नाशिक: राज्यात गेल्यावेळी लोकसभेच्या जिंकलेल्या जागा राष्ट्रवादी लढणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली घोषणा ही भाजपची भूमिका आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला संपविण्याच्या षडयंत्राचा तो एक भाग आहे. संघाचे षडयंत्र असेच कपटी असते, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. पराभूत करू शकत नाही, त्यांचे पक्ष फोडा, त्यातून काही साध्य होत नसेल तर, मग संबधित पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे चरित्र्यहनन करा, अशी भाजपची नीती आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेने काही देश, त्यातील नेत्यांवर खोटे आरोप, हल्ले करण्यासाठी असेच धोरण अवलंबल्याचा दाखला राऊत यांनी दिला.

दादा भुसे बदनामीप्रकरणी दाखल खटल्यात दोन वेळा गैरहजर राहिलेले राऊत हे शनिवारी मालेगाव येथील न्यायालयात हजर झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. भाजप काही लोकांना हाताशी धरून आमचे पक्ष, नेतृत्व संपवण्यासाठी चरित्र्यहनन करत आहे. त्यातून त्यांना काही मिळणार नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष आजही भक्कमपणे उभे असल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा… नाशिक जिल्ह्यात गुटखा विरोधी अभियानात ५५६ छापे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याविषयी शरद पवार यांच्या भूमिकेसंदर्भात केलेल्या विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. शरद पवार यांनी सांगितले असताना मग तुम्ही परत का आलात, असा प्रश्न केला. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान आहे. अजित पवार गटाकडून होणारे बेछूट आरोप ही भाजपने लिहून दिलेली संहिता असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे हे सध्या ज्या तुरुंगाच्या कोठडीत आहेत, त्याच कोठडीत नाशिकचे सध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना २०२४ च्या निवडणुकीनंतर ठेवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.