जळगाव – शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न केल्यास भाजपचे नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही, अशी टीका ठाकरे यांचे नाव न घेता केली.
कम ऑन किल मी…हिंमत असेल तर अंगावर या…पण अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभच्या चित्रपटात तो अॅम्बुलन्स घेऊन येतो तशी अॅम्बुलन्स घेऊनच या. कारण तुम्ही पायावर चालत जाणार नाही, तर जाताना आडवे होऊन स्ट्रेचरवर जाल, असा आसूड उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मेळाव्यात ओढला होता. ठाकरे यांच्या या टिकेला उत्तर देताना शुक्रवारी जळगाव येथे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलबच्चन भैरवी अशी उपाधी दिली. अशांना मी उत्तर देत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धरणगाव येथे केले. तत्पूर्वी, जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आदिवासी स्वातंत्र्य सेनानींचा गौरव झाला पाहिजे, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम काही वर्षांपासून हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून क्रांतिकारी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी यापूर्वी धरणगावात आलो होतो. आता स्मारकाच्या उद्घाटनाची संधीही मिळाली, असे फडणवीस यांनी नमूद केले.