लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: पंचवटी विभागात पाणी टंचाईच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले असून अनेक इमारतीत वारंवार टँकरने पाणी मागवावे लागत आहे. मनपाकडून केवळ तासभर कमी दाबाने पाणी पुरविले जाते. दुसरीकडे अंदाजे पाणी देयके वसूल केली जातात. हा स्थानिकांवर अन्याय असल्याची तक्रार करीत पाणी टंचाईसह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

ॲड. सुरेश आव्हाड, हाजी मोईयोद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. पंचवटीतील सत्यदेवनगर, काकडनगर, रामकृष्णनगर, मनपा कॉलनी, मानकर मळा, म्हाडा कॉलनी आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या भागात पाणी पुरवठ्याची वेळ एक तासाची ठेवली गेली असून तोही अवेळी होतो. कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याने टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. अंदाजे पूर्ण पाणीपट्टी वसूल करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

हेही वाचा… नाशिक: रायगडमधील दुर्घटनेला सरकारी अनास्था जबाबदार , राजू शेट्टी यांचे टिकास्त्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तवली डोंगरालगतच्या परिसरात नागरी वस्ती वाढत आहे. परंतु, या भागात रस्त्यांची कामे झालेली नसल्याने स्थानिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. पेठ रस्त्यावर जकात नाका ते राऊ हॉटेल चौकापर्यंत आरटीओ कॉर्नर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. अर्ज करूनही घरपट्टीची आकारणी होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन तक्रारी करूनही दखल न घेता बंद केल्या जातात. या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी मनपा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.