नाशिक – पक्षात संघटनात्मक बदल करताना विचारात न घेतल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) गटात नाराजीचे सूर उमटत आहेत. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ जण नाराज असून अनेकदा हा विषय मांडूनही पक्षाकडून निर्णय होत नसल्याने अस्वस्थता असल्याकडे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी लक्ष वेधले.
महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेली हजेरी आणि ठाकरे गटाचे उपनेते बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकाच दिवशी घेतलेली भेट, या घटनाक्रमाने महायुतीकडून ठाकरे गटाला पुन्हा नाशिकमध्ये धक्का देण्याची मोर्चेबांधणी झाल्याचे उघड होत आहे. या घटनाक्रमात बडगुजर यांनी पक्षातील अस्वस्थता असल्याचे जाहीर केल्यामुळे ठाकरे गटात सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटात चार महिन्यांपूर्वी संघटनात्मक बदल झाले. त्या अंतर्गत बुडगजर यांना उपनेतेपदी बढती दिली गेली. जिल्हाप्रमुखपदी डी. जी. सूर्यवंशी यांना नियुक्त करण्यात आले. तेव्हापासून ठाकरे गटात अस्वस्थता असल्याचे बडगुजर यांचे म्हणणे आहे.
महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह संघटनेतील १० ते १२ जण नाराज आहेत. ही बाब वारंवार वरिष्ठांसमोर मांडून सुधारणेची आवश्यकता मांडली. परंतु, अद्याप निर्णय झालेला नाही. संघटनात्मक बदल करताना स्थानिकांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. महानगरप्रमुखपदी काम करणाऱ्या विलास शिंदे यांना बढती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, वरिष्ठ पद न मिळाल्याने तेही नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही बरोबर काम केले. प्रतिकूल परिस्थितीत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आणला. त्यामुळे विलास शिंदे यांना न्याय देणे गरजेचे होते, असे बडगुजर यांनी प्रसारमाध्यमांकडे नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपण भाजपशी जवळीक साधली नाही. या भेटीची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना होती. राजकीय चर्चा बंद दाराआड होते. मी उघडपणे भेट घेतली, असे बडगुजर यांनी सांगितले.