नाशिक – जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात काही गावांमध्ये मंगळवारी दुपारी व सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट आहे. शिंदे गावात जमिनीतून आवाज आल्याचे सांगितले जाते. या भूकंपाची तीव्रता किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा केंद्रबिंदू देखील लक्षात येणार नसल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दळवट व परिसर भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या भागासह सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भागात पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात भूगर्भात काही हालचाली जाणवतात, असे स्थानिकांकडून सांगण्यात येते. मंगळवारी दुपारी व सायंकाळी सुरगाणा तालुक्यातील शिंदे गावासह आसपासच्या सहा ते सात किलोमीटरच्या परिघात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
जमिनीतून आवाज येत असल्याचे शिंदे गावच्या सरपंचांनी तहसील कार्यालयास कळविले. प्रशासनाने आसपासच्या भागातून माहिती घेतली. तेव्हा नागशेवडी, वांझुळपाडा, मोहपाडा, चिराई, रोटी, हरणटेकडी भागात सौम्य धक्के जाणवल्याचे निष्पन्न झाले, असे सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड यांनी म्हटले आहे.
या धक्क्यांनी कुठलेही नुकसान झाले नाही. परंतु, भूगर्भातील आवाज व धक्के यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाची तीव्रता जाणून घेण्यासाठी प्रशासनाने महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (मेरी) भूकंप मापन केंद्राशी संपर्क साधला. त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर याबाबत स्पष्टता होणार आहे.
सुरगाणा हा गुजरातलगतचा दुर्गम आदिवासी तालुका आहे. सुरगाणा, कळवण तालुक्यातील दळवण तसेच पेठ या आदिवासी भागात मागील काही वर्षात अधुनमधून भूगर्भात घडामोडी जाणवत असल्याचे सांगितले जाते. दळवट, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, खिराड, बोरदैवत गावांमध्ये नेहमी भूकंपाचे धक्के बसत असतात. यामुळे ग्रामस्थांना अनेकदा रात्र घराबाहेर जागून काढावी लागल्याची उदाहरणे आहेत.
या पार्श्वभूमीवर, काही वर्षांपूर्वी पुनद धरणावर वेधशाळा उभारण्यात आली. परंतु तिथे भूकंपमापन यंत्रणा बसविली गेली नसल्याचे सांगितले जाते. सुरगाणा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, तरी त्याचा केंद्रबिंदू मिळणे अवघड आहे. कारण, भूकंपाचा केंद्रबिंदू शोधण्यासाठी धक्क्यांची तीन वेधशाळा अर्थात भूकंपमापन केंद्रांवर नोंद होणे गरजेचे असते. सद्यस्थितीत जलसंपदा विभागाच्या राज्यातील ३० भूकंप वेधशाळांपैकी २८ वेधशाळा बंद आहेत.
नाशिक व इसापूर (उर्ध्व पैनगंगा) येथील भूकंपमापन यंत्रे सुस्थितीत आहेत. जलसंपदा विभागाव्यतिरिक्त केंद्र सरकारची राष्ट्रीय भूकंप विज्ञान संस्था मुंबई, पुणे, कराड, लातूर, नागपूर, अकोला येथे स्थापलेल्या सहा यंत्रात स्थानिक भूकंपाची नोंद घेते. त्यांच्यामार्फत तीन रिश्टर स्केलपेक्षा कमी क्षमतेच्या, स्थानिक भूकंप धक्क्यांची नोंद घेतली जात नसल्याचे जाणकार सांगतात. परंतु, देशातील भूकंपाच्या अनुषंगाने अद्ययावत माहिती भूकंप विज्ञान संस्थेच्या संकेतस्थळावर तात्काळ उपलब्ध होत असल्याचे धरण सुरक्षितता संघटनेचे म्हणणे आहे.