नाशिक – मालेगाव तालुक्यात वडगांव आणि इतर खेड्यांमध्ये गोवंश जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील नाउघड गुन्ह्यांचा शोध घेण्याविषयी सूचना केल्यानुसार सहायक अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्या सुचनेनुसार उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथक आणि मालेगांवचे पथक नाउघड गोवंश जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते. मालेगाव तालुक्यात एक महिन्यापासून शेतकऱ्यांची बैलजोडी आणि गाय रात्रीच्या वेळी चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या माध्यमातून गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी तसेच बागलाण तालुक्यातील जायखेडा, सटाणा आणि नांदगाव या ठिकाणी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची चोरी करण्यात आल्याचे उघड झाले. मगर यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच माहितीच्या आधारे मालेगाव आणि धुळे येथे कारवाई करत या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेतले. यामध्ये शाकीर शाह फकीर (३५, रा. धुळे), रहेमान शाह (३८, रा. मालदे शिवार), मोहम्मद शाह (३०, रा. धुळे), संतोष परदेशी (रा. धुळे), बशीर शेख (२३, रा. पवारवाडी) यांना ताब्यात घेतले. तर शेख सुलतान रज्जाक , रहेमान कुरेशी हे फरार आहेत. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी वाहनासह २५ हजार रक्कम ताब्यात घेतली आहे. शाकीर शाह हा सराईत गुन्हेगार आहे. शेख सुलतान आणि रहेमान शाह हे गोवंश तस्करीसाठी परिसरात पाहणी करायचे. त्यानंतर मोटारीतून बंद गोठ्याची कटरने जाळी तोडत जनावरांची चोरी करत होते.