नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्यावतीने महाजनसंपर्क अभियान राबविले जाणार आहे. मतदान केंद्रस्तरीय रचना सशक्त व्हावी, यासाठी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी झोकून द्यावे व समाजातील सर्व घटकांची सर्वसमावेशक मतदान केंद्रस्तरीय रचना करावी. केंद्र समितीतील पदाधिकारी तसेच लोकसभा आणि विधानसभा विस्तारक यांच्यातील सुसंवाद वाढल्यास या अभियानाला गती मिळेल, असे भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी म्हटले आहे.
भाजपच्या येथील वसंतस्मृती कार्यालयात लोकसभा व विधानसभा विस्तारकांच्या कार्यशाळेत चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी समाज माध्यमांवरील सर्व व्यासपीठांचा प्रभावीपणे व्यापार करावा असेही सूचित केले. रघुनाथ कुलकर्णी यांनी विस्तारक योजना आणि या योजनेतील विस्तारकाची भूमिका यावर मार्गदर्शन केले. विस्तारक म्हणून आपली भूमिका आपल्या क्षेत्रात स्थानिक भाजपचा नेता म्हणून नाही तर त्या भागातील सहकारी म्हणून असायला हवी. त्यासाठी प्रारंभीच्या काळात विस्तारकांचा परिचय सर्वांना झाला पाहिजे. विस्तारक ज्याच्या क्षेत्रात कार्यरत असतील, त्याच्या क्षेत्रातील प्रदेश जिल्हा व मंडल पदाधिकाऱ्यांबरोबरच शक्ती केंद्रप्रमुख व केंद्र समित्यांचाही परिचय करून घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
हेही वाचा >>> जळगाव : सत्य शोधण्यासाठी पोलीस अधिकार्याने बैलगाडी हाकत गाठले घटनास्थळ
विस्तारक योजनेचे संयोजक कृपाशंकर सिंह यांनी विस्तारकाच्या प्रवासातील कार्यक्रम यावर मार्गदर्शन केले. विस्तारकांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करावे. यासाठी प्रत्येक दिवशी आपल्याला कोणाला भेटायचे आहे याचे नियोजन करावे व महत्त्वाच्या कामांचा पद नकाशा प्रवासाला जाण्याआधी तयार करावा. त्या त्या भागातील जुन्या,नवीन कार्यकर्त्यांची माहिती संकलित करावी व या माध्यमातून शहरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावे. यातून विस्तारक योजनेच्या अभियानात गती मिळू शकेल, असे सांगितले.
रवी अनासपुरे यांनी आपल्यास माहिती असणारी वस्तूनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. जे विषय माहिती नाहीत, त्याची चुकीची माहिती देऊ नये असेही सूचित केले. मतदान केंद्रस्तरीय समिती ३० सदस्यांची असावी. त्या परिसरातील समाज घटकांचा विचार करून ती सर्वसमावेशक करावी, असेही ते म्हणाले.बैठकीत अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील विस्तारक उपस्थित होते.