नाशिक – तासाभराच्या पावसात शहरातील दहीपूल, सराफ बाजार आणि आसपासचा भाग जलमय होऊन अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. ग्राहकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली. अकस्मात आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने व्यावसायिकांना आवरासावर करण्यास वेळ मिळाला नाही. वाहनतळावरील वाहने अस्ताव्यस्त झाली. पावसाळापूर्व नालेसफाईची कामे न झाल्याची ही परिणती असल्याचा आरोप नाशिक सराफ असोसिएशने केला आहे.
रविवारी सायंकाळी अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात म्हणजे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३.४ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तासाभरात ४० मिलीमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात येते. पावसाचा फटका मध्यवर्ती भागातील बाजारपेठेला बसला. नाले आणि पाणी वाहून जाण्यासाठी स्मार्ट सिटीने केलेली यंत्रणा कुचकामी ठरली.
पावसाच्या पाण्याचे लोट दहीपूल, फुलबाजार ते सराफ बाजार चौक भागात शिरले. काही दुकानांमध्ये चार ते पाच फूट उंचीपर्यंत पाणी आल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवासे यांनी सांगितले. शुक्ल गल्लीसह आसपासच्या भागातही पाणी होते. वाहनतळावरील दुचाकी अस्ताव्यस्त झाल्या.
या परिसरात मोठ्या संख्येने विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यांच्याकडून कचरा टाकला जातो. या भागातील नाल्यांची सफाई न झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. नालेसफाई योग्य प्रकारे झाल्यास असे प्रकार घडणार नाहीत.
महापालिकेकडे पाठपुरावा करूनही उपयोग झाला नसल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने दहीपूल परिसरात खास व्यवस्था केली आहे. परंतु, मुसळधार पावसात ती तोकडी पडल्याचे जलमय झालेल्या स्थितीवरुन दिसले. तासाभराच्या पावसाने बिकट स्थिती निर्माण झाल्याचे चेतन राजापूरकर यांनी सांगितले.