धुळे – जिल्ह्यातील नऊ हजार २५४ विद्युत ग्राहकांनी बसविलेल्या सौर पॅनलची स्थापित क्षमता ३३.९७ मेगावॅट झाली आहे.यामुळे सौर ऊर्जा पॅनल बसविलेल्या अनेक ग्राहकांना आपले मासिक वीज बिल शून्य करणे शक्य झाले आहे,असा दावा महावितरण कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा या चार तालुक्यातील जवळपास नऊ हजार २५४ ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेतल्याचा दावा महावितरणने केला आहे. या सर्व ग्राहकांनी आपापल्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीज निर्मिती सुरु केली आहे. दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळावे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी-२०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविता येऊ शकते.

ग्राहकांसाठी ही संधी असल्याचा दावा महावितरण तर्फे करण्यात येतो. ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेचे लाभार्थी झालेल्या बहुतेक ग्राहकांना दरमहा येणारे वीजबिल जवळपास शून्य करणे शक्य झाले आहे. त्यामुळे या योजनेला विद्युत ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच या योजनेला जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली असून कर्जाची प्रक्रियाही सुलभ झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना मेळाव्यांद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. याबरोबरच महावितरणकडून १० किलोवॅट क्षमते पर्यंतच्या मागणी अर्जांना ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकाला सौर नेट मीटरही महावितरणकडूनच उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज संबंधित ग्राहकांना दिवसा वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जाते.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार रुपये,दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळत आहे. ३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. सुमारे २५ वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेत स्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प उभारण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प उभारल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.

वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. महावितरणच्या वेबसाईटवरील अक्षय ऊर्जा पोर्टलवरही अधिक माहिती व अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पीएम-सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसवणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून यासंबंधीच्या सर्व प्रकिया ऑनलाईन व सुलभ करण्यात आली आहे. – आय.ए. मुलाणी, मुख्य अभियंता (महावितरण)