जळगाव : जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ग्रामविकासमंत्री असतानाही गिरीश महाजन यांनी काहीएक केले नाही. मंत्रिमंडळ बैठकांत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर कधी बोलले नाहीत. ते बैठकांत झोपा काढतात. आता ते आपल्यावर बेताल वक्तव्य करीत आहेत. महाजनांनी तोंड सांभाळून बोलावे. मी खोलात गेलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी दिला आहे.

शहरातील एका हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ग्रामविकासमंत्री महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांना लक्ष्य केले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. पाटील यांनी जिल्हा बँकेमार्फत गावस्तरावरील विविध कार्यकारी सोसायट्यांतील सचिव व शेतकर्‍यांना कर्ज वितरणावेळी होत असलेल्या अडचणी, केळी पीकविम्याबाबत अर्ज राज्यस्तरीय समितीने नाकारल्याने प्रलंबित असलेले १० हजार ६१९ शेतकरी आणि अर्ज प्रलंबित ठेवण्यात आलेले ११ हजार ३६० शेतकरी, यांच्या अर्जांची सद्यःस्थिती, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, पोकरा योजना अशा शेतकर्‍यांशी निगडित विविध मुद्यांवर भाष्य केले.

हेही वाचा : रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकर्‍यांसाठी विविध लाभाच्या योजना आहेत. मात्र, जिल्ह्यातील शेतकरी शासकीय अनुदानासाठी टाहो फोडत आहेत. केळी व कापूस पीकविम्यापासून शेतकरी अजूनही वंचित आहेत. पीकविम्यासाठी मंत्र्यांकडून काहीही प्रयत्न केले जात नाही. पोकरा योजनेचा लाभही मिळाला नाही. मंत्री असूनही महाजन हे अनेक वर्षांपासून गिरणा नदीवरील बलून बंधार्‍यांसाठी निधी आणू शकले नाहीत. आपल्या जिल्ह्यात एकही गाव पोकरा योजनेत घेतले नाही. शेतकर्‍यांना आता उमजून चुकलेय की मित्र कोण आणि दुश्मन कोण ? मंत्रिमंडळाच्या बैठकांत ते झोपा काढतात आणि प्रसारमाध्यांशी संवादात ते आपल्यावर बेताल वक्तव्य करतात. त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आता मी अधिक खोलात गेलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल आणि त्यांना जामनेरच्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला आहे. जिल्हा बँकेत फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता आणल्याचे श्रेय महाजन घेत आहेत. मग त्यांनी आता शेतकर्‍यांच्या कर्जाचा आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांचा जो प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्याकडे महाजनांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.