जळगाव – जिल्ह्यात तापीसह गिरणा, वाघूर आणि इतरही बऱ्याच नद्यांवर गणेश विसर्जनासाठी गर्दी झाली होती. पैकी गिरणा नदीवर गणेश विसर्जनासाठी कुटुंबासह गेलेल्या एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. पोलिसांसह नातेवाईकांनी त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले.

गणेश गंगाराम कोळी (२७, रा. ममुराबाद, ता. जळगाव), असे गिरणा नदीत बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. आई-वडील आणि बहीण यांच्यासोबत तो पाळधी-तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावर नव्याने उभारलेल्या गिरणा नदीवरील पुलाखाली घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास मूर्तीसह नदीत उतरल्यानंतर त्याला नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी कुटुंबियांनी आरडाओरड केली. परंतु, नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कोणीच त्याला वाचवू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच ममुराबाद गावातील त्याचे नातेवाईक आणि मित्र मदतीसाठी धाऊन आले. तोपर्यंत तालुका पोलिसांनाही घटनेची माहिती कळविण्यात आली.

तालुका पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत गणेश कोळी याचा शोध गिरणा नदीच्या पात्रात घेतला. परंतु, धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शोध कार्यात बरेच अडथळे आले. रविवारी सकाळी पुन्हा शोध कार्याला गती देण्यात आली. गिरणा काठावरील आव्हाणे, आव्हाणी, खेडी, वडनगरी, फुपनगरी तसेच कानळदा गावालगतच्या किनाऱ्यांवरही त्याचा शोध घेण्यास सुरूवात झाली. पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर गिरणा धरणात ९६ टक्क्यांवर पाणी साठा झाला आहे. परिणामी, पाटबंधारे विभागाकडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. ज्यामुळे नदीत सुमारे ९७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, गिरणा प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येईल. त्यामुळे गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा चाळीसगाव येथील पाटबंधारे विभागाच्या उप अभियंत्यांनी दिला आहे. गिरणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेता संबंधित शासकीय यंत्रणांनी देखील याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.