नाशिक – दहावी, बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले आणि प्रमाणपत्र मिळविण्यात विद्यार्थ्यांसह पालकांची दमछाक होत असल्याची स्थिती आहे. अर्ज दाखल केल्यानंतर १५ दिवसांत दाखला मिळणे अभिप्रेत असते. मात्र जिल्ह्यात सद्यस्थितीत २० दिवस उलटूनही दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार एक एप्रिल ते आठ जून या कालावधीत दोन लाख ४८ हजार ७५७ दाखले वेळेत दिले गेले. तर सध्या ४७ हजारहून अधिक दाखले प्रलंबित आहेत. दाखले मिळण्यात कालापव्यय होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरणे अवघड झाले आहे.

पुढील शिक्षणक्रमास प्रवेश घेताना अर्जाबरोबर विविध प्रकारचे दाखले विद्यार्थ्यांना जोडावे लागतात. यामध्ये राष्ट्रीयत्व, जातीचा दाखला, प्रतिज्ञापत्र, स्थलांतर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, इडब्लूएस आदींचा समावेश आहे. यासाठी त्यांना आपले सरकार केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. अकरावी तसेच तंत्रनिकेतसह अन्य शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विविध दाखले मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परंतु, प्राप्त अर्जांचा निपटारा वेळेत होत नसल्याची विद्यार्थ्यांसह पालकांची तक्रार आहे.

वेळेत दाखले मिळत नसल्याने संबंधितांना आपले सरकार केंद्रावर खेटे घालावे लागतात. अनेकदा केंद्र चालकांना उत्तर देणे अवघड होते. विलंबामुळे काही पालक वाद घालतात, असे चालक सांगतात. काही शिक्षणक्रमांची प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली तरी दाखला मिळाला नाही. तर काहींची मुदत संपण्याच्या मार्गावर असूनही दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. १८ दिवस उलटूनही अर्ज काहींना अर्ज मिळालेले नाहीत.

अडीच लाख दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण

एक एप्रिल ते आठ जून २०२५ या कालावधीत विविध प्रकारच्या २१ दाखल्यांसाठी दोन लाख ९६ हजार ७२५ अर्ज आले होते. यातील दोन लाख ४९ अर्जांचा निपटारा करून दाखले, प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यात शैक्षणिक दाखल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत ४७ हजार ६९८ अर्ज प्रलंबित आहेत. यातही राष्ट्रीयत्व व अधिवास ७६६९, उत्पन्नाचे दाखला अर्ज १९१३५, स्थलांतर प्रमाणपत्र १०६१८, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ९१७८, रहिवासी दाखला ४६४ असे हे प्रमाण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये विभागाकडे प्रलंबित अर्जांची संख्या ३३ हजार ४६७ असल्याची आकडेवारी आहे. आतापर्यंत एकूण दोन लाख ४८ हजार २९७ अर्ज मान्य करून दोन लाख ४७ हजार ७५७ दाखले व प्रमाणपत्रांचे वेळेत वितरण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. ७३० अर्ज फेटाळण्यात आले.