नाशिक : सण, उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रमावेळी होणारे अन्नदान यासह अन्य काही वेळा होणाऱ्या अन्न पदार्थांच्या विक्रीवेळी खाद्य पदार्थाची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची धावपळ होते. अपुरे मनुष्यबळ तसेच साधनांची कमतरता यामुळे कामात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासन विभागाला लवकरच मनुष्यबळ, साधनांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या अंदाजपत्रकात साधनांसाठी निधी मंजूर होणार आहे. मनुष्यबळासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास सुरूवातही झाली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सातत्याने वेगवेगळ्या मोहिमा राबवत प्रतिबंधित खाद्यपदार्थ, अन्न पदार्थांमधील भेसळ, राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित सुपारी यांच्यावर कारवाईसाठी काम करण्यात येत आहे. बऱ्याचदा कारवाईत जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमधील भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. प्रयोगशाळा मुंबई आणि पुणे या ठिकाणी असल्याने नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर अहवाल मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. दुसरीकडे, अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम एकाचवेळी असतात. अशावेळी सर्व कार्यक्रमांमधील अन्न पदार्थांची तपासणी करणे अपुऱ्या मनुष्यबळामुळे कठीण होते. वेगवेगळ्या मिठाई दुकानांत, दुग्धालयात पनीर, दुधासह अन्य काही खाद्य पदार्थांची तपासणी करतांनाही मनुष्यबळाची अडचण येते. नाशिक जिल्ह्यात अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या अधिक भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नाशिक विभागातील सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यावेळी फिरती प्रयोगशाळा, अपुऱ्या मनुष्यबळाच्या अडचणी लवकरच सोडवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा : आस्था एक्स्प्रेसवर नंदुरबारजवळ दगडफेक ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त संजय नारगुडे यांनी नाशिक जिल्ह्यात ११ पदे रिक्त असल्याचे सांगितले. ही पदे भरण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्राथमिक परीक्षा झाली आहे. अद्याप पुढील प्रक्रिया अपूर्ण आहे. दुसरीकडे, प्रयोगशाळेत येणाऱ्या तपासणीच्या अहवालासाठी कराव्या लागणाऱ्या प्रतिक्षेमुळे राज्यात फिरत्या प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी वरिष्ठ पातळीवर नियोजन सुरू असले तरी निधीची प्रतिक्षा आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या अंदाजपत्रकात यासाठी तरतूद होणार असून यानंतर पुढील कामास सुरूवात होईल, असे नारगुडे यांनी नमूद केले.