नाशिक : शासनाच्या वतीने बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात असतानाही बालविवाह सर्रासपणे होत आहेत. अंबड येथील कारगिल चाैक परिसरात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती अंबड औद्योगिक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पालकांशी संवाद साधत विवाह रोखला.

अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगरातील कारगिल चौक परिसरात एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा एक एप्रिल रोजी चाळीसगाव तालुक्यातील पोहरे येथील मुलाशी विवाह होणार असल्याची माहिती अंबड औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांकडून बालविवाह रोखण्यासाठी हालचालींना वेग आला. लग्नाचा दिवस जवळ आल्याने अल्पवयीन मुलीच्या घरी लगीन घाई सुरू होती. काही जवळचे नातलगही लगीनघरी आले होते. वधू अल्पवयीन असल्याने वधू आणि वर यांच्या पालकांना पोलीस चौकीत बोलविण्यात आले. वधू आणि वर हे एकाच गावातील आणि नात्यातील असल्याने पालकांनी मुलांच्या संमतीने लग्न ठरवले होते.

हेही वाचा : धुळे शहरात हलका पाऊस

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पालकांकडे मुलांच्या वयाचे दाखले मागून चौकशी केली. अल्पवयीन मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले. त्यानंतर वधू आणि वर यांच्या पालकांकडून वय पूर्ण होईपर्यंत विवाह करणार नसल्याचे लेखी घेण्यात आले.

हेही वाचा : धुळ्यात काँग्रेस उमेदवाराच्या शोधात

बालविवाह होणार असलेल्या मुलीचे संपूर्ण कागदपत्र तपासून घेत ती अल्पवयीन असल्याची खात्री करून घेण्यात आली. वधू आणि वर कुटुंबियांची समजूत काढण्यात पोलीस प्रशासनास यश आल्याने बालविवाह रोखला गेला. याबाबत अंबड औद्योगिक पोलीस चौकीच्या वतीने बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा बालविकास अधिकारी प्रकल्प (नागरी) नाशिक शहर यांच्याशी पत्रव्यवहार करुन माहिती देण्यात आली आहे.