जिल्ह्य़ात वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये तीन जणांनी आत्महत्या केली. इगतपुरी तालुक्यातील घटनेत प्रेमी युगुलाचे मृतदेह तलावात आढळले तर शहरातील पेलिकन पार्क येथे मनोरुग्णाने आजारपणाला कंटाळून पेटवून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अनुक्रमे घोटी तसेच अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या अस्वली हर्ष येथील तलावात दोन मृतदेह तरंगत असल्याची बाब सरपंच पिंटू कडाळी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही घटना घोटी पोलिसांना कळवली. घोटी पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह उपनिरीक्षक गणेश शेळके आदीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले. २१ वर्षीय युवक व १८ वर्षीय युवतीने एकमेकांना ओढणीच्या साहाय्याने घट्ट बांधून आत्महत्या केल्याची बाब समोर आली. मृतदेह पाण्यात जास्त दिवस राहिल्याने चेहरे विद्रूप झाल्यामुळे ओळख पटविणे अवघड झाले होते. मृतदेहावरील पोशाखांच्या आधारे पोलिसांनी काही तासांत दोघांची ओळख पटविली. त्र्यंबक तालुक्यातील झारवड येथील पोपट पिलाजी जाधव (२१) आणि इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील सत्यभामा नथुजी घारे (१८) यांचे हे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पोपट हा सत्यभामाचा सख्खा मामा असल्याचे तपासात समोर आले. या प्रकारात त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबत यंत्रणा छाननी करत आहे.
अशीच घटना नवीन नाशिक पेलिकन पार्क येथे घडली. मोरवाडी येथील रहिवासी गौतम प्रकाश मुळे (३५) यांनी पार्कच्या मोकळ्या आवारात अंगावर इंधन टाकून स्वत:ला पेटवून घेतले. जवळच स्मशानभूमी असल्याने हा प्रकार आधी कोणाच्या लक्षात आला नाही. सकाळी तो लक्षात आल्यावर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. मुळे हे आजारी होते. नैराश्यामुळे मानसिक झटके येत असल्याने नाशिक बाहेर त्यांच्यावर उपचार सुरू होते. या स्थितीला वैतागलेल्या मुळे यांनी मंगळवारी रात्री स्वत:ला पेटवून घेतले. सकाळी परिसरातील काही नागरिक नैसर्गिक विधीसाठी गेले असताना काही जळाल्याचा वास आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.