नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, साधू-महंतांच्या भावना जाणून घेण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने पहिल्यांदा वैष्णव आणि शैवपंथीय आखाड्यांचे महंत एकत्र येतील का, याबाबत उत्सुकता आहे. शैवपंथीय आखाड्यांमध्ये मतभेद होऊन फाटाफूट झाल्याचे सांगितले जाते. शिवाय बैठकीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वादाचे सावट आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तिढा सुटत नसल्याने याचा कुंभमेळ्याच्या तयारीवर परिणाम होऊ नये, याकडे भाजपने लक्ष दिले आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनार्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या अनुषंगाने आमच्याही सूचना जाणून घ्याव्यात, असा साधू-महंतांचा आग्रह आहे. त्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होत आहे. पूर्वसंध्येला परिसरात स्वच्छता, सभागृहात फलक लावणे, आसन व्यवस्था आदी तयारी करण्यात आली.
बैठकीसाठी प्रशासनाने नाशिकमधील तीन वैष्णवपंथीय आणि त्र्यंबकेश्वरमधील १० शैवपंथीय अशा एकूण १३ आखाड्यांच्या प्रत्येकी दोन महंतांना निमंत्रित केले आहे. शैव आणि वैष्णवपंथीय आखाड्यांमध्ये आधीपासून वाद आहेत. शैवपंथीयांनी यापूर्वी त्र्यंबकेश्वरची बैठक त्र्यंबकेश्वरमध्ये घेण्याची मागणी केली होती. याचा संदर्भ देत त्र्यंबकेश्वरमधील काही महंत बैठकीस येतील, काही येणार नाहीत, असे संकेत आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी ‘लोकसत्ता’ ला दिले. त्र्यंबकेश्वरमधील शैवपंथीय आखाड्यांमध्ये मतभेद आहेत. त्याचा परिणाम बैठकीतील उपस्थितीवर पडू शकतो, असे सांगितले जाते.
वादापासून प्रशासन तटस्थ
देशातील सर्व आखाड्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरून साधू-महंतांच्या दोन गटात वाद आहेत. उभयतांकडून या पदावर दावा सांगितला जातो. प्रशासनाने प्रयागराजच्या धर्तीवर, सर्व १३ आखाड्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून या वादापासून दूर राहण्याची भूमिका घेतली. आखाडा परिषदेचे अध्यक्ष व महामंत्री यांना प्रशासनाने स्वतंत्रपणे निमंत्रित करावे, असा आग्रह धरला गेला. प्रशासनाने तो मान्य केला नाही. कोणत्या गटाची आखाडा परिषद खरी याची स्पष्टता नाही. या वादात पडण्याऐवजी प्रशासनाने तटस्थ राहणे पसंत केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.