नाशिक – शिवसेना (उद्धव ठाकरे) गट संपविण्यास खासदार संजय राऊत हेच पुरेसे आहेत. त्यांच्या बडबडीला पक्षातील सर्व जण वैतागले असून हा गट आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, असा दावा भाजपचे नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला. नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर केलेल्या आरोपांना मंत्री महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. ठाकरे गटाचे पदाधिकारी अलीकडेच नाशिकमध्ये संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले. परंतु, पुढील आठ दिवसांत या पक्षात कोण राहील, कोण नाही, अशी स्थिती आहे.
राऊत हे नियंत्रणाबाहेर गेले आहेत. त्यांच्या बडबडीने पक्षातील सर्व त्रस्त असल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. लाडक्या बहीण योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप महाजन यांनी फेटाळला. या योजनेत काही चुकीचे अर्ज भरले गेले. छाननीअंती ही नावे कमी होत आहेत. यात चुकीचे काहीही नसून कसला घोटाळा झाला, असा प्रश्न त्यांनी केला. प्रसिद्धी मिळत असल्याने राऊत हे बेछुट विधाने करतात. त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. ठाकरे गटाने महापालिका निवडणुकीला सामोरे जावे. तेव्हा कोण अनाथ झाले, कोणाचा विकास झाला ते कळेल. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील अनेक पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. आठवडाभरात चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सूचित केले.