‘स्वच्छ भारत मिशन’साठी स्थानिक पातळीवर ‘सैराट’ युक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ मोहिमेचा गवगवा मोठय़ा स्वरूपात झाला असला तरी योजनेच्या यशस्वीतेपेक्षा तिच्या प्रसिद्धीसाठी ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या योजनांचाच अधिक गवगवा झाला. अतिशय नियोजनबद्धरीत्या प्रसिद्धी मोहीम राबविली गेली असली तरी त्यात येणाऱ्या काही अडथळ्यांमुळे योजनेच्या व्यापकतेस ग्रामीण भागात मर्यादा आल्याचे दिसून येते. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत हागणदारीमुक्त गावांसाठी नाशिक जिल्ह्य़ात अगदी ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूच्या चेहऱ्याचा वापर करून घेण्यात आला. धुळ्यातील काही ठिकाणी तर ‘येडय़ांची जत्रा’ या मराठी चित्रपटाचाही जनजागृतीसाठी आधार घेण्याचे नियोजन आहे.
स्वच्छ भारत मिशन या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात विविध उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले. अलीकडेच या मिशनअंतर्गत राज्यातील १० हजार ७७० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या. मार्च २०१७ पर्यंत १० जिल्हे, तर उर्वरित २३ जिल्हे मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त होऊन संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ राज्य म्हणून घोषित होईल, असे राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी जाहीर केले आहे. नाशिक जिल्ह्य़ातही या योजनेंतर्गत कामाने बऱ्यापैकी वेग घेतला असून नाशिक तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त, तर कळवण तालुका १५ जानेवारीपर्यंत हागणदारीमुक्त होऊ शकेल, असे जिल्हा परिषदेच्या ग्राम स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्य़ात ४९ हजार ४४८ शौचालयांचे काम पूर्ण झाले असून ५४८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. पंतप्रधानांची योजना असल्याने ती फळास आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे. केंद्र किंवा राज्य शासनावर संपूर्णपणे निर्भर न राहता आपापल्या पद्धतीने स्वच्छ भारत मिशनविषयी जनजागृती करण्याकरिता स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्यात आले. उदाहरणार्थ म्हणून सिन्नर नगरपालिकेकडून झालेल्या जनजागृतीविषयक प्रयत्नांचा उल्लेख करता येईल. सिन्नर पालिकेने शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी लोकांमध्ये जागृतीकरिता सैराट चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या आर्ची म्हणजेच रिंकु राजगुरूच्या चेहऱ्याचा वापर करून घेतला. शहरात अनेक ठिकाणी खास ग्रामीण भाषेत आर्ची हागणदारीमुक्तीचा संदेश देत असल्याचे फलक पालिकेच्या वतीने लावण्यात आले. शहरात बाहेरून येणाऱ्यांसाठी हे फलक चर्चेचा विषय झाले होते. ठरावीक कालावधीनंतर दोन महिन्यांपूर्वी हे फलक काढून घेण्यात आले. सिन्नर पालिकेसाठी १६५८ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी ८१० शौचालयांचे काम झाले असून ९०० शौचालयांचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यात काही प्रमाणात अडथळा आल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
‘येडय़ांची जत्रा’, अॅपचा वापर
राष्ट्रीय पातळीवर अक्षय कुमार ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाव्दारे स्वच्छ भारत मिशनचा संदेश देण्याच्या तयारीत असताना धुळे आणि नाशिक जिल्ह्य़ाच्या सीमेवरील काही गावांमध्ये या मिशनतंर्गत हागणदारीमुक्त गावासाठी सुमारे दोन वर्षांंपूर्वी प्रदर्शित झालेल्या भरत जाधव अभिनित ‘येडय़ांची जत्रा’ या चित्रपटाचा आधार घेण्याची योजना आहे. या चित्रपटातून विनोदी पद्धतीने हागणदारीमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. दुसरीकडे जळगाव महापालिकेने डिजिटल इंडिया व स्वच्छ भारत अभियानाची योग्य सांगड घालत दोन ‘अँड्रॉइड अॅप’ गुरुवारपासून कार्यान्वित केले. यात शहरातील नागरिकांची प्रसाधन व स्वच्छतागृह नसल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘टॉयलेट लोकेटर’ हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरात ६४ ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृहे असली तरी बहुतेकांना प्रसाधनगृहांचे निश्चित ठिकाण माहीत नसल्याने त्यांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत होते. ही गैरसोय टाळण्यासाठी मुंबईसह अन्य मोठय़ा शहरांच्या धर्तीवर महापालिकेने प्रसाधनगृह शोधण्यासाठी अॅप तयार केले आहे.