नाशिक: जुने नाशिक परिसरातील धोकादायक वाड्यांना नोटीसा बजावण्यासह संबंधित ठिकाणचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याची तयारी करण्यात आली आहे. यात पूर्व विभागातील ३७३ धोकादायक वाड्यांचा समावेश आहे. पूर्व विभागात अतिधोकादायक १७ आणि कमी धोकादायक १४ वाड्यांची पाणी आणि वीज जोडणी खंडित करण्यात आली. तर पंचवटी विभागात ९५ वाड्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पावसाळ्यात जुनाट वाड्यांची पडझड होऊन प्राणहानी रोखण्यासाठी उपरोक्त धोकादायक ठिकाणी कुणी वास्तव्य करणार नाही यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

महापालिकेने धोकादायक वाड्यांची यादी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिसांना दिली आहे. दरवर्षी मुसळधार पावसात जुनाट वाड्यांची पडझड ठरलेली असते. धोकादायक वाड्यांमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांना मनपा दरवर्षी नोटीस बजावते. मात्र संबंधितांकडून जागा रिक्त करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही बाब लक्षात घेऊन यंदा धोकादायक वाड्यांमध्ये कुणी वास्तव्य करू शकणार नाही, अशी व्यवस्था केली जात आहे. त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणची वीज व पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यासंबंधीचे पत्र मनपा प्रशासनाने पाणी पुरवठा विभाग आणि महावितरणला दिले आहे. काही विभागात धोकादायक वाड्यांमधील वीज, पाणी पुरवठा जोडणी खंडित करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. धोकादायक वाड्यात राहणाऱ्या नागरिकांना नोटीसा देऊन वाडे खाली करण्याची सूचना करण्यात आली.

हेही वाचा… पाण्यासाठी धुळेकर रस्त्यावर; महापालिकेवर हंडा मोर्चा

गोदावरीच्या पुरात काठालगतच्या टपऱ्या वाहून जाण्याचा संभव असतो. त्यामुळे या टपऱ्या उचलून न्याव्यात म्हणून मनपाकडून प्रत्यक्ष जाऊन टपरीधारकांना नोटीस दिली जात आहे. मान्सूनपूर्व कामांच्या आढावा बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक (प्रभारी) भाग्यश्री बाणायत यांनी विविध सूचना केल्या. पावसाचे पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे अनेक भागात पाणी शिरते, असा अनुभव आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यास सांगण्यात आले. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नदी पात्रालगतचे अतिक्रमण हटवणे आणि सार्वजनिक ठिकाणे, मोकळ्या जागांवर अतिक्रमण होणार नाही यासाठी दक्षता घेण्याची सूचना बाणायत यांनी केली.

हेही वाचा… नाशिक: जिल्हा नियोजन बचत निधीचा वाद शीगेला; अनियमिततेच्या चौकशीची राष्ट्रवादी आमदारांची मागणी, नियोजन विभाग अप्पर मुख्य सचिवांकडे तक्रार

मनपाचा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाला आहे. सर्व अधिकाऱ्यांनी कामे वेगाने पूर्ण करावीत, तक्रारींचा निपटारा युद्धपातळीवर करा, असा आदेश आयुक्तांनी बैठकीत दिला. मनपाकडे प्राप्त तक्रारी, मुख्यमंत्री सचिवालय, पीएम पोर्टलवरील तक्रारी वेळेत निकाली निघतील या दृष्टीने खबरदारी घेण्याची सूचना केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० हजार रोपांच्या लागवडीचे नियोजन

प्रत्येक अधिकाऱ्याने पाच झाडे दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची सूचना आयुक्तांनी केली. तसेच एका क्षयरुग्णाचा ‘निक्षय मित्र’ बनून त्या रुग्णाला सहा महिने पोषण आहाराचे वाटप करण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन आयुक्तांनी बैठकीत केले. त्याला सर्व अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. क्षयरुग्णांना मदतीसाठी पुढे येणाऱ्या व्यक्ती, संस्थांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. मनपाच्या यांत्रिकी विभागाने नुकतेच मलनिस्सारण प्रकल्प, पंपिंग स्टेशन, खत प्रकल्पात २०० झाडांची लागवड केली आहे. मनपाच्या उद्यान विभागाकडूनही यंदा शहरात विविध ठिकाणी २० हजार वृक्षारोपणाचे नियोजन आहे.