नंदुरबार – जिल्ह्यातील प्रकाशा येथे एका मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा प्रशासनाने कारवाई करत थांबविल्याची माहिती नंदुरबार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद वळवी यांनी दिली आहे. ग्रामीण भागात आजही बहुतेकांची मानसिकता मुलीचे लग्न लवकर करुन जबाबदारीतून मोकळे व्हावे, अशी आहे. त्यामुळेच मुलीचे वय विवाहायोग्य नसतानाही तिचे लग्न लावले जाते.

काहीवेळा जाणूनबूजून तर, काही वेळा नकळतपणे हे घडते. २४ मे रोजी प्रकाशा येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाइन १०९८ यावर प्राप्त झाल्याने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

पथकाने प्रकाशा येथील ग्रामसेवक बी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ आणि चाईल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी बाळकृष्ण निकुंभे यांनी मुलीच्या पालकांचे समूपदेशन केले. त्यांना बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ ची माहिती देण्यात आली. तसेच, बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम आणि कायद्यातील तरतुदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कायद्याचे स्वरुप

अजूनही बहुसंख्य जणांना बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे, याची जाणीव नाही. विशेषत: दुर्गम भागात हे वारंवार दिसून येते. बालविवाह केल्यास होणाऱ्या शिक्षेपासून पालक अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना या कायद्याची जाणीव करुन देणे हे प्रशासनाचे काम आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती आवश्यक आहे. कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण नसल्यास तो विवाह बालविवाह ठरतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे असे विवाह आयोजित करणारे, त्यात सहभागी होणारे आणि प्रोत्साहन देणारे यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.आपल्या आजूबाजूला कोठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस हेल्पलाईन ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वळवी यांनी केले आहे.