जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे विशेषतः गिरणा नदी परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि वाहतूक धोकादायक बनली आहे. प्रशासनाच्या आशिर्वादाने अजूनही अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. अवजड वाहनांमुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे.
ग्रामीण भागातील प्रमुख मार्गांवरून अवैध वाळू वाहतूक करणारी अवजड वाहने दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर धावताना दिसून येतात. त्यामुळे रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरली जात असल्याने रस्त्यांची ताकद कमी होऊन ठिकठिकाणी रस्ते खचले आहेत. या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून, अपघातांचा धोका वाढला आहे. अधिकाऱ्यांशी असलेल्या संगनमताने सुरू असलेला वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे शासनाचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कारवाई करण्याचे आश्वासन देत असली, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
परिसरातील ग्रामस्थांनी या अवैध वाळू वाहतुकीवर तात्काळ बंदी घालून रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू असताना, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. रात्रभर अवैध वाळू वाहतूक सुरू असतानाही महसूल कर्मचारी आणि अधिकारी तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास अपयशी ठरले आहेत. वाळू माफियांनी प्रशासनालाच गाफील ठेवत हा काळाबाजार उघडपणे सुरू ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तत्काळ हस्तक्षेप करून या माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, ट्रक आणि डंपरने वाळूची बिनधास्त वाहतूक सुरू असते. महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांना त्याची माहिती असूनही ते दुर्लक्ष करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
दरम्यान, अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी प्रशासनाकडून कधी तरी गस्त घालण्यात येत असते. मात्र, ती केवळ दिखाव्यापुरतीच असल्याची चर्चा स्थानिकांत आहे. सायंकाळी सात वाजेपासून सकाळी आठपर्यंत वाळूची अवैध वाहतूक बिनधास्त सुरू असते. वाळू चोरीस आळा घालण्यात अथवा कारवाई करण्यास महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी त्यामुळे ग्रामीण भागातून केली जात आहे.