नाशिक – अतिवृष्टीमुळे नाशिक विभागात झालेल्या नुकसानींचे तत्काळ पंचनामे करुन त्याची मदत बाधितांना मिळेल, यादृष्टीने कार्यवाही करावी, पावसामुळे विस्थापित नागरिकांना निवारा तसेच अन्नपाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन शेतकऱ्यांना मदत विनाविलंब मिळेल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी विभागातील पाचही जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर हे यावेळी उपस्थित होते.

डॉ. गेडाम म्हणाले की, विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचही जिल्ह्यातील काही भागात घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनावश्यक साहित्याचे आणि घराचे नुकसान झाले आहे. याशिवाय, शेतकऱ्यांचे पशुधनही या अतिवृष्टीमध्ये मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वप्रथम या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्राधान्य देणे, त्यांना निवारा आणि जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करणे आदी बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. बाधित नागरिकांना तत्काळ मदत करवी, नुकसानीसाठी उणे प्राधिकारपत्रावर अनुदान वितरित करण्यास यापूर्वीच शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे वेगळ्याने अनुदान प्राप्त होण्याची वाट न पाहता मदतीची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

शेतपीकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच पंचनाम्यानंतर राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर विनाविलंब ती शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होईल, यापद्धतीने कार्यवाही करावी. त्यासाठी जी माहिती आवश्यक आहे, ती आताच जिल्हा प्रशासनाने जमा करुन ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जून ते ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचे अनुदान यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत ९० कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत अनुदान वाटपास विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना गेडाम यांनी दिल्या.