नाशिक : दिवाळीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे दूषित झालेले जलसाठे आणि दिवाळीसारख्या सणामुळे खाद्यपदार्थांमधून होणाऱ्या भेसळीचा वाढता धोका लक्षात घेता दिपोत्सव काळात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आल. बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी दुषित झाले आहे.
ग्रामीण भागात दूषित झालेल्या पाणीसाठ्यांचे आणि स्रोतांचे नमुने तातडीने तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले. गावोगावी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासावेत. तसेच, नैमित्तिक संसर्ग उद्रेकांबाबत खबरदारी घेऊन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे, दीपावली सुट्टीच्या काळात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
बैठकीत लोणावळी येथील मनशक्ती प्रयोग केंद्राच्या माध्यमातून तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे ‘मनशक्ती प्रशिक्षण’ घेण्यात आले. याशिवाय, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन आणि आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत १३८४ ग्रामपंचायतींमधील जलस्रोतांची पाहणी करून पाण्याची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे. सर्व आश्रमशाळांतील पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण करून दूषित पाणी पुरवठा होणार नाही, याची समिक्षा करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले.
दरम्यान, बैठकीत वातावरणीय बदल, बालमृत्यू, माता मृत्यू, ॲनिमियामुक्त भारत, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, नियमित लसीकरण, पाणी गुणवत्ता, कुटुंब नियोजन, आयुष, कायाकल्प आणि ई-औषधी, ई-संजीवनी, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सिकलसेल, गोवर रुबेला लसीकरण, आयुष्मान भारत डिजिटल मिशन, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अभियान, एचआयव्ही एड्स नियंत्रण अभियान, गर्भलिंग निदान विरोधी अभियान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, तसेच इतर सर्व महत्त्वाच्या आरोग्य विषयक कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, डॉ. युवराज देवरे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा समन्वयक तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.