नाशिक : जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी बांधव, बचत गट, विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कलाग्राम सुव्यवस्थित ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात येईल. पुढील काही दिवसांत कलाग्राम हे नाशिकमधील महत्वाचे पर्यटन केंद्र होईल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मंत्री भुजबळ यांनी शनिवारी अधिकाऱ्यांसमवेत गंगापूर परिसरातील कलाग्राम कामाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत कलाग्रामच्या कामाची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण, पर्यटन महामंडळाचे कार्यकारी अभियंता महेश बागूल, ग्रामविकास विकास अधिकारी डी. एन. पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
समीर भुजबळ यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात दिल्ली हाटच्या धर्तीवर कलाग्रामची उभारणी करण्याचे ठरविले. २०१४ मध्ये काम पूर्ण झाले. परंतु, कलाग्राम सुरू होऊ शकलेले नाही. कलाग्राम सुरु होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. अनेकदा दुरुस्तीसाठी पैसे आणले. परंतु, प्रत्यक्षात काम सुरू होऊ शकले नाही. आता पर्यटन विभागाने पुन्हा ४.९० कोटी रुपये निधी मंजूर केला असून आता काम पूर्ण केले जात आहे. व्हिलेज संकल्पनेवर असलेल्या या कलाग्राममध्ये ९९ गाळे आहेत. शेतकरी, आदिवासी बांधव, महिला बचतगट, मूर्तिकार यासह विविध कला सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कलाग्राम हे महत्वाचे व्यासपीठ राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महालक्ष्मी सरसच्या धर्तीवर कलाग्राम सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. हे कलाग्राम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करून चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. याठिकाणी हंगामानुसार वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करण्याकरिता गाळे अतिशय नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याची सूचना संबंधित विभागाला करण्यात आली आहे. दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होऊन कलाग्राम सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.