लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: शहर परिसरात अलिकडेच मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सापडला असताना दुसऱ्या बाजूला शाळेजवळील सिगारेट, तंबाखू विक्री करणाऱ्या टपऱ्या महापालिकेच्या मदतीने हटवणारे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे हल्ला होणे, ही बाब चिंताजनक आहे. राज्यातील विद्यार्थी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकू नयेत, यासाठी शाळा-महाविद्यालयांबाहेरील पानटपऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्हा आणि शहरात पोलिसांनी भरारी पथके स्थापन करावीत, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
मागील काही दिवसात शहर परिसरातून कोट्यवधींचे अंमली पदार्थ मुंबई आणि नाशिक पोलिसांनी जप्त केले. अंमली पदार्थांचा प्रश्न एका शहरापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण राज्यात पसरला आहे. त्यामुळे ‘उडता पंजाब’ सारखा ‘उडता महाराष्ट्र’ होऊ देऊ नका, असे आवाहन आमदार तांबे यांनी केले आहे.
आणखी वाचा-सह्याद्री हजार कोटींची उलाढाल करणारी पहिली शेतकरी कंपनी, २०२२-२३ वर्षात ५० कोटींचा नफा
मुंबईसह अनेक शहरांत शाळा-महाविद्यालयांजवळील पानटपऱ्या, लहान दुकानात अंमली पदार्थ विकण्याच्या घटना याआधी उघडकीस आल्या होत्या. शालेय मुलांना व्यसनाधीन करून अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याचे प्रकार घडले होते. नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडत असेल, तर नाशिकच नाही, तर राज्यभरातील पालक, शाळा प्रशासन आणि पोलीस या सर्वांनीच सावध राहायला हवे, असे तांबे यांनी सूचित केले.
देशातील तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकले असतील, तर त्यांची कार्यक्षमता कमी होते. सुदृढ तरुण ही देशाची खरी संपत्ती असते. अंमली पदार्थांच्या व्यसनापासून तरुणांना आणि खास करून शाळकरी मुलांना वाचवू शकलो नाही, तर तो देशाच्या भवितव्यासाठी मोठा धोका असेल. पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. शाळा प्रशासनानेही त्यांच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली घडतात का, याकडे लक्ष द्यायला हवे. मुंबई पोलिसांनी शाळा-महाविद्यालयांबाहेरील पानटपऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी भरारी पथके स्थापन केली होती. त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरात पोलिसांनीही अशी पथके तयार करावीत, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली आहे.
आणखी वाचा-नाशिक: कंत्राटीकरण, खासगीकरणाविरोधात दलित महासंघाचे आंदोलन
शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेला शाळांबाहेरील सिगारेट-तंबाखु विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर अंमली पदार्थांचे साठे जप्त झाले. त्या पाठोपाठ कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या सर्व गोष्टी एकमेकींशी जोडलेल्या नाहीत ना, याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे आमदार तांबे यांनी म्हटले आहे.