जळगाव : मुक्ताईनगरातील संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्ह्यातील शुक्रवारी सायंकाळी आयोजित दौरा व्यवस्थित पार पडला. मात्र, नियोजित कार्यक्रम आटोपून रात्री परतीच्या प्रवासाला मुंबईकडे निघताना वैमानिकाने विमान उडविण्यास ऐनवेळी नकार दिल्याने मोठा गोंधळ उडाला. तब्बल ४५ मिनिटे शिंदे यांना त्यामुळे हतबल होऊन जळगाव विमानतळावर ताटकळावे लागले.
मुक्ताईनगरातील नियोजित कार्यक्रम आटोपून रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहोचले. त्यांच्याबरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे विमानात बसून काही तासातच मुंबईत पोहोचणार होते. परंतु, तेवढ्यात शिंदे यांना मुंबईहून घेऊन आलेल्या वैमानिकाने प्रकृतीचे कारण देत विमानाचे उड्डाण करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तब्बल १२ तास उड्डाण केल्यामुळे शारीरिक थकवा जाणवत असल्याचे वैमानिकाने सांगितल्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांना प्रतिक्षा कक्षात हतबल होऊन बसावे लागले. मंत्री महाजन आणि पालकमंत्री पाटील यांनी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडूनही वैमानिकांची मनधरणी करण्यात आली. वैमानिकाच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आले. दरम्यान, मंत्री महाजन आणि पाटील यांनी स्वतः विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. तेव्हा कुठे वैमानिक विमान घेऊन मुंबईच्या दिशेने रात्री उशिरा रवाना होण्यास तयार झाला. या गोंधळात तब्बल ४५ मिनिटे एकनाथ शिंदे यांना प्रतिक्षा कक्षात नाईलाजाने बसावे लागले. त्यांचे पुढील नियोजित कार्यक्रम देखील त्यामुळे रखडले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वैमानिकाच्या तब्येतीची आणि वेळेची अडचण होती. तसेच काही तांत्रिक अडचणी होत्या. विमान कंपनीशी आम्ही बोललो. त्यानंतर त्यांनी वैमानिकाला त्यांच्या भाषेत व्यवस्थित समजावले. त्यामुळे ४५ मिनिटांच्या गोंधळानंतर अखेर विमान एकनाथ शिंदे यांना घेऊन मुंबईच्या दिशेने झेपावले, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.