लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: येवला तालुक्यात पाण्याची टंचाई अधिक आहे. अलनिनोचा प्रभाव लक्षात घेऊन जुलैअखेरपर्यंत पाणी पुरवठा होईल, अशा प्रकारे नियोजन करून कुठल्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासंदर्भात तक्रार प्राप्त होता कामा नये, अशी सूचना आमदार छगन भुजबळ यांनी केली. शहरात पुराचे पाणी शिरून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक नाल्यांतील अडथळे दूर करावेत, असेही त्यांनी सूचित केले.

भुजबळ यांनी येवला येथील प्रशासकीय संकुलाची पाहणी केली. यावेळी विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित बैठकीत मार्गदर्शन केले. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. तातडीने हे खांब पुन्हा उभे करून वीज पुरवठा सुरळीत करावा. शहरात गेल्या वर्षी पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले होते. नैसर्गिक नाल्यांतील अडथळा दूर करून कुठेही अनधिकृत बांधकाम होऊ नये, याची दक्षता घ्यावी. यावर्षी त्याची पुनरावृत्ती नको म्हणून उपाय योजना तातडीने कराव्यात, असेही त्यांनी सूचित केले.

आणखी वाचा-महागाईवर नियंत्रणासाठी केंद्राचे प्रयत्न: कैलास विजयवर्गीय यांचे आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावाची सद्यस्थिती, येवला नगरपरिषदेच्या कोपरगाव तालुक्यातील तलाव, येवला शहरातील स्वच्छता, येवला शहर पावसाळापूर्व कामे, येवला आणि ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तलावातील पाण्याची स्थिती, राजापूर आणि ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव आणि १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या कामांचा आढावा घेतला. खरीप हंगामपूर्व तयारीच्या अनुषंगाने खते, बी-बियाणे उपलब्धता, पीक कर्ज, जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना भरपाई, अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांच्या मदतीची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. यावेळी प्रशासकीय संकुलात टप्पा दोन अंतर्गत इतर प्रशासकीय कार्यालय, उपाहार गृह, परिसरातील सौंदर्यीकरण कामे व लहान मुलांसाठी खेळणीसह मैदान या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.