नाशिक – शहरातील हत्यासत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसून रविवारी मध्यरात्री पंचवटीत पेठरोडवरील फुले नगरातील गौडवाडीत एका मध्यमवयीन व्यक्तीची हत्या करण्यात आली. पंचवटी पोलिसांनी अवघ्या चार तासात दोन संशयितांना ताब्यात घेतले.
रविवारी मध्यरात्री १२ ते दोन या वेळेत फुले नगरातील महानगरपालिका शाळा क्रमांक ५६ समोर एका किराणा दुकानाजवळ संजय सासे (४०, रा. महालक्ष्मी चाळ) हे बसलेले असताना संशयितांनी डोक्यात विटांचे प्रहार करुन त्यांची हत्या केली. हा प्रकार अन्य लोकांच्या लक्षात येताच मारेकऱ्यांनी पळ काढला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त पद्मजा बढे यांनी संशयितांना पकडण्याविषयी सूचना केल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी पाहणी केली. मानवी कौशल्याचा वापर तसेच तांत्रिक बाबीचा आधार घेत तपासी पथकाने विशाल क्षीरसागर (२४) आणि धीरज सकट (३०, रा. फुलेनगर) यांना अवधूतवाडी येथील गणपती मंदिराच्या छतावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता विशालचा भाऊ प्रमोद याचा मृत्यू झालेला असून त्याच्या मृत्युला संजय सासे जबाबदार असल्याचा संशय त्याला होता. त्यातूनच त्याने आपल्या साथीदारासह सासे यांची हत्या केली. अवघ्या चार तासात पोलिसांनी हत्येचा उलगडा केला.
कॉमन मॅन सुरक्षित आहे काय ?
काही महिन्यांपासून शहर हत्यांमुळे गाजत आहे. एकमेकांना शह देण्यासाठी, मागील भांडणाची कुरापत काढत, सामाजिक दहशत पसरविण्यासाठी मुडदे पाडले जात आहेत. समाजकंटकांच्या कारवाया सामान्यांना नवीन नाहीत. परंतु, बुधवारी पैशांसाठी १९ वर्षीय युवकाची झालेली हत्या, बहिणीच्या एकतर्फी प्रेमप्रकरणात युवकाची झालेली हत्या, संजय सासे यांची हत्या, विधीसंघर्षित बालकांना गुन्हेगारी विश्वाची पडलेली भुरळ पाहता काही प्रकरणांमध्ये आता सामान्य माणसेही शस्त्र किंवा मिळेल ते हत्यार घेत कायदा व सुव्यवस्था हातात घेत आहेत. कायद्याचा धाक राहिलेला नाही. पोलिसांचा दंडुका केवळ जमाव पांगविण्यासाठी राहिला आहे काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे. शहरात कॉमन मॅन आणि पोलीस एकत्र असल्याच्या शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतेच झालेले असले तरी शहरात आता सर्वसामान्य नाशिककर सुरक्षित नसल्याचे दिसत आहे.