तालुक्यातील वेश्वी परिसरात जलवाहिनी फुटल्याने दोन दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. या संदर्भात उरणच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर ग्रामसेविका यांनी जलवाहिनी दुरुस्त केली असल्याचा दावा केला आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनींवरून गावासाठी घेतलेल्या जलवाहिनीवरून डंपर गेल्याने जलवाहिनी फुटून पाणी रस्त्यातून वाहून गेले. या संदर्भात गटविकास अधिकारी वाय. एम. प्रभे यांनी ग्रामसेवकांना याचा जाब विचारला आहे. तर वेश्वीच्या ग्रामसेविका सरोज पाटील यांनी दुरुस्त करण्यात आलेली होती, मात्र पुन्हा एकदा फुटली असावी, अशी माहिती दिली. ती दुरुस्त करून पाणी गळती थांबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.