नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ४०५ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. याच वेळी त्यांच्या २२५ त्यांच्या नातेवाईकांनाही लागण झाल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, बाधित पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या करोना अलगीकरण आणि विलगीकरण केंद्रात रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता संपत आल्याने नव्याने सापडलेल्या बाधितांना अन्यत्र दाखल केले जात आहे.

दिघा ते उरण असा मोठा विस्तार असलेल्या नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीत सध्या साडेचार हजार पोलिसांचे मनुष्यबळ आहे. त्यात विविध रजा, साप्ताहिक सुटी, याशिवाय न्यायालय आणि वैद्यकीय तपासणीसाठी कैद्यांची जबाबदारी असलेल्या रोज किमान २०० पोलीस कर्मचारी कामात व्यग्र असतात. यात कार्यालयीन कामकाजासाठी एक हजारच्या आसपास कर्मचारी व्यग्र असतात. याशिवाय गुन्हा करून पळून गेलेल्या आरोपीचा माग काढण्यासाठी राज्याबाहेरील भागांत पोलिसांना जावे लागते. अशा वेळी शहरातील कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांची संख्या दोन हजारांच्या आसपास असते. त्यात आता चारशेहून अधिक पोलिसांना लागण झाल्याने मनुष्यबळ कमी पडत आहे. आजवर १५० पोलीस करोनामुक्त झाले आहेत. ते कामावर रुजूही झाले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी राज्यात प्रथम बाधित पोलिसांसाठी नेरुळ येथील ‘सावली’ संस्थेच्या इमारतीत अलगीकरण आणि विलगीकरण केंद्र उभारले. या ठिकाणी ५० पोलिसांवर उपचार करण्यासाठी सोय आहे. मात्र,  बाधितांची संख्येत वाढ झाल्याने केंद्रात खाटा अपुऱ्या पडत आहेत.

आजवरची स्थिती

* अधिकारी :    ५५

* पोलीस कर्मचारी :     ३५०

* एकूण :      ४०५

* नातेवाईक :   २२५

* पोलीस मृत्यू :       ०१

* नातेवाईक मृत्यू :     ०२

बाधित पोलिसांची संख्या चारशेवर आहे. अर्थात हे कर्मचारी कामावर असताना बाधित झाले आहेत. मात्र, संसर्ग झाल्यानंतर योग्य वेळी निदान आणि योग्य उपचारांमुळे करोनामुक्त झालेल्या पोलिसांची संख्याही जास्त आहे. याशिवाय मृत्यूची नोंद नाही.

-सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त विशेष शाखा