नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला खासगी कंपन्या तसेच दानशूर व्यक्तींमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) गोळा करण्याचे वेध लागले आहेत. शहरातील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी लागणारा पैसा या निधीच्या माध्यमातून उभा करण्याचे संकेत नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून देण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिका एका विशेष कंपनीची स्थापना करण्याच्या तयारीत आहे.

नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी येत्या आर्थिक वर्षाचा पाच हजार ७०९ कोटी रुपयांच्या जमा-खर्चाचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. पालिकेच्या वेगवेगळ्या बँकांमध्ये १३०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्याज पालिकेस दरवर्षी मिळते. यामध्ये पुढील वर्षात वाढ होणार आहे. ठाणे-बेलापूर औद्याोगिक पट्ट्यातील मोठ्या कंपन्या तसेच दानशूर व्यक्तींकडून सामाजिक माध्यमातून दिला जाणारा निधी कसा गोळा करता येईल याची चाचपणी आता पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

निधीचा उपयोग सामाजिक उपक्रमांवर

● कंपन्या तसेच नागरिकांकडून ‘सीएसआर’च्या माध्यमातून निधी गोळा करण्यासाठी महापालिकेने नवी कंपनी स्थापन करण्याचे संकेत या अर्थसंकल्पात दिले आहेत. ही कंपनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कार्यरत राहील, अशी माहिती आयुक्त डॉ. शिंदे यांनी दिली. सीएसआरमार्फत उभा केला जाणारा निधी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण तसेच अपंगांसाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांवरच खर्च केला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● या भागातील कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून महापालिकेतील काही योजनांना हातभार लावण्यास सहमती दर्शविल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. याबाबतची कार्यपद्धती लवकरच ठरवली जाईल, असेही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.