पूनम सकपाळ

सुका मेवा बाजारपेठेची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना ही आणखीन एक पर्याय उपलब्ध होईल या उद्देशाने मुंबई कृषी उत्पन्न मसाला बाजारात बेदाणे लिलाव केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र एपीएमसीत अजूनही बेदाण्याला ग्राहक नसल्याने विक्री होत नाही, परिणामी ग्राहकांअभावी बेदाणे लिलाव केंद्र बंदच आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ आधी मुंबईमध्ये स्थित होती. कालांतराने बाजारपेठेची व्यापकता वाढवण्यासाठी नवी मुंबईत स्थलांतर करण्यात आले, तेव्हापासून एपीएमसी बाजार समितीची वार्षिक उलाढाल वाढत आहे. बेदाणे विक्री केंद्र सुरू केले तर आर्थिक भर पडेल तसेच शेतकऱ्यांना आणखीन एक पर्याय उपलब्ध होईल . मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बेदाणे लिलाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. सोलापूर,नाशिक, धुळे, सांगली, सातारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. द्राक्ष परदेशात निर्यात देखील केली जातात. त्याचबरोबर द्राक्षांवर प्रक्रिया करून बेदाणे तयार केले जातात. त्यामुळे राज्यातच मोठ्याप्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेण्यात येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांना बेदाणे विक्रीसाठी सोलापूर आणि सांगली येथे बाजारपेठ उपलब्ध आहे. अजून एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या मालाला चांगला हमीभाव मिळावा याकरिता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणे लिलाव केंद्र सुरू करण्यात आले होते . परंतु बेदाण्याचे भाव कमी असून सध्या प्रतकिलो १२०-१८०रुपयांनी विक्री होत आहे. शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळण्याची अपेक्षा होती ,मात्र तोही मिळत नाही. तसेच ग्राहक नसल्याने बेदाण्याची बाजारात विक्री देखील होत नाही, त्यामुळे सध्या तरी हे बेदाणे लिलाव केंद्र बंद आहे, अशी माहिती मसाला बाजाराचे संचालक विजय भुता यांनी दिली आहे.